खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणातनितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र व वॉरंट जारी केले आहे.
मुंबई (Defamation Case) : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात माझगाव न्यायालयाने भाजप नेते व मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वारंवार अनुपस्थित राहिल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, नितेश राणे यांनी ७ मे रोजी केलेल्या एका वक्तव्यात संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असा दावा केला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या आधी किंवा १० जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही त्यांनी सार्वजनिकरीत्या म्हटले होते. या वक्तव्यामुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी माझगाव न्यायालयात सुरू असताना नितेश राणे यांनी हे प्रकरण अन्य न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी करत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर ठरवलेल्या दोन सुनावण्यांना राणे अनुपस्थित राहिल्याने माझगाव न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे आता नितेश राणे यांना न्यायालयात हजर राहून जामीन मिळवावा लागणार आहे.
या वादाची सुरुवात राज्यातील सत्तांतराच्या राजकीय पार्श्वभूमीवर झाली होती. मे २०२३ मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख अपमानास्पद शब्दांत केला होता. त्यानंतर त्यांनी राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला. या सर्व वक्तव्यांमुळे आपली सार्वजनिक प्रतिमा धोक्यात आली असल्याचे सांगत राऊत यांनी न्यायालयात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला.
या प्रकरणामुळे दोन्ही नेत्यांमधील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.