प्रशासणाचे आश्वासन विरले हवेत
रिसोड (Cremation Ground Demand) : रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील कडुजी रामभाऊ आघाव या युवकाने गावहितासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील महिन्यात 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत त्यांनी गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी उपोषण केले होते. मात्र, बीडीओ यांच्या मध्यस्थीने दिलेल्या आश्वासनानंतर ते उपोषण पुढे ढकलण्यात आले होते.
मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. बोरखेडी गावाला प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत कडुजी आघाव यांनी 11 मे पासून ग्रामपंचायत समोर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांना रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
10 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या उपोषणाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते. त्यावेळी रिसोड पंचायत समितीचे बीडीओ आणि विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन काही दिवसांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, स्थानिक ग्रामपंचायत सचिवांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओबीसी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष दीपक किशनराव बुधवंत यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. स्मशानभूमी ही गावासाठी अत्यावश्यक सुविधा असून त्यासाठी उपोषण करावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग वाढत असून प्रशासनाने तातडीने स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.