Collector Rahul Gupta: संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीटंचाई निवारण उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले
हिंगोली (Collector Rahul Gupta) : संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीटंचाई निवारण उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले. संभाव्य एल-निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सर्व उपविभागीय अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्हा जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी जलयुक्त शिवार, सीसीटी, डीपसीसीटी, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण, रिचार्ज शॉफ्ट, ढाळीचे बांध आदी जलसंधारणाची प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या टंचाईग्रस्त गावांमध्ये तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून 20 बोअरवेल व 26 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित विद्युत जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलयुक्त शिवाराची कामे, वृक्षलागवड, भूजल पातळी तपासणी तसेच बियाणे व खताचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. पुढील 15 दिवसांत टंचाई भासू शकणाऱ्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय, इसापूर, सिद्धेश्वर, येलदरीसह विविध धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यात पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे, प्रत्येक शासकीय कार्यालय परिसरात पावसाचे पाणी साठवण व्यवस्था करावी तसेच सर्व कामांचे जीओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खत विक्रेत्यांनी खत लिंकिंग होत नसल्याबाबतचे फलक व हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावेत तसेच खतसाठा व दैनंदिन वापराचा नियमित आढावा घ्यावा. पशुधनासाठी संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी आवश्यक चारा नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी बैठकीत दिल्या.