वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
मुंबई (Bandra Encroachment) : वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांनी पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.
वांद्रे परिसरातील रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई मानली जात आहे. पश्चिम रेल्वेकडून आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाद्वारे ही मोहीम राबवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरने वांद्रे रेल्वेलाईनलगतच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.
माहितीनुसार, वांद्रे रेल्वे हद्दीत तब्बल ५ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. यापूर्वीही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला अडथळा निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
गरीब नगर झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या या कारवाईला स्थानिकांनी विरोध दर्शवला. काही नागरिकांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव हटवला.
दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.