उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे घडलेल्या एका भीषण चौपट हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.
प्रयागराज चौपट हत्याकांडाने देश हादरला; मुलानेच रचला कुटुंबाच्या हत्येचा कट, साथीदाराने त्यालाच संपवले
प्रयागराज (Prayagraj Quadruple Murder Case) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे घडलेल्या एका भीषण चौपट हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तब्बल 8,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या आलिशान बंगल्यात एका व्यावसायिकासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गुन्ह्याचा उलगडा केल्याचा दावा केला असला, तरी या हत्याकांडामागील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
मृतांमध्ये व्यावसायिक वीरेंद्र कुमार वैश्य (70), त्यांची पत्नी अनिता (65) आणि मुलगी मीनाक्षी (45) आणि मुलगा अभिषेक (40) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येचा कट अभिषेक वैश्यनेच रचला होता. 31 मे रोजी त्याने आपला मित्र सनी गुप्ता याला घरी बोलावले. दोघांनी मिळून कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा कट आखल्याचा पोलिसांचा दावा आहे.
तपासानुसार, अभिषेक वडिलांवर नाराज होता. मालमत्तेतून वगळल्याचा राग आणि आर्थिक कर्जाच्या ओझ्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संध्याकाळी सुमारे 5 वाजता मीनाक्षी कुटुंबाच्या दुकानात आल्यानंतर तिच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह वरच्या मजल्यावर नेण्यात आला. काही वेळातच वीरेंद्र कुमार आणि अनीता यांचीही निर्दयीपणे हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानुसार तिघांच्या डोक्यावर वारंवार प्रहार करण्यात आले होते.
लुटीच्या वाटणीवरून वाद, साथीदारानेच अभिषेकची हत्या केली
हत्येनंतर घरातून सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने लुटण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र त्यानंतर कथानकाला धक्कादायक वळण मिळाले. दागिन्यांच्या वाटणीवरून अभिषेक आणि सनी यांच्यात वाद झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिषेकने सनीला लुटीतील केवळ काही हिस्सा देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे संतापलेल्या सनीने त्याच लोखंडी रॉडने अभिषेकचीही हत्या केली. चौकशीदरम्यान सनीने पोलिसांना, "जो स्वतःच्या आई-वडिलांची हत्या करू शकतो, तो माझाही विश्वासघात करू शकतो," असे सांगितल्याचे वृत्त आहे.
वीरेंद्र कुमार वैश्य यांचा भेटवस्तूंचा व्यवसाय होता. ह्युएट रोड चौकात त्यांचे दोन मजली घर होते. हे घर 8 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे असून त्याची किंमत 10 ते 15 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. खालच्या भागात 14 दुकाने असून त्यापैकी 13 भाड्याने दिलेली आहेत. वीरेंद्र आपल्या कुटुंबासह वरच्या भागात राहत होते. त्यांची मुलगी, मीनाक्षी, भेटवस्तू विकण्याचे एक दुकान चालवत होती. वीरेंद्र वैश्य हे देखील त्याच दुकानात काम करत असत. त्यांचा मोठा मुलगा, अभिषेक, कीटकनाशके आणि फरशी स्वच्छ करण्याच्या द्रावणांचा व्यापार करत असे. अभिषेक आणि मीनाक्षी यांचे लग्न झाले नव्हते. धाकटा मुलगा कौशांबी तुरुंगात असून त्याची पत्नी, रितू, जामिनावर बाहेर आहे.
मुलाचे वडिलांशी भांडण होते
पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, मोठा मुलगा अभिषेकचेही वडिलांशी पटत नव्हते. शेजारी आणि नातेवाईकांच्या मते, अभिषेकच्या संगतीवरून कुटुंबात अनेकदा वाद होत असत. एकदा अभिषेकने कोणाकडून तरी अनेक लाख रुपये उसने घेतले होते. वेळेवर पैसे परत न केल्यामुळे, अभिषेकच्या कर्जदारांनी त्याला मारहाण करून घेऊन गेले. पैसे परत न केल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली. नंतर, त्याची बहीण मीनाक्षीने पैसे देऊन अभिषेकची सुटका केली. यावरून वीरेंद्रचे अभिषेकशी भांडण झाले.
150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने उलगडा
या प्रकरणाचा तपास एखाद्या गुन्हेपटाप्रमाणे झाला. पोलिसांनी दोन किलोमीटर परिसरातील सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एका कॅमेऱ्यात अभिषेकसोबत सनी घरात प्रवेश करताना दिसला, तर दुसऱ्या फुटेजमध्ये तो पहाटे एकटाच घरातून बाहेर पडताना दिसला.
यानंतर स्थानिक दुकानदारांनीही सनीची ओळख पटवली. पोलिसांनी त्याला अटक करून घरातून लुटलेले दागिने जप्त केल्याचा दावा केला आहे.
हत्या करून मृतदेह ब्लँकेट आणि रजयांनी झाकले
पोलिसांच्या सूत्रांनुसार, मुलाने आणि त्याच्या मित्राने मिळून कुटुंबाच्या हत्येचा कट रचला. त्यांनी आधी वीरेंद्र वैश्य यांची, त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी घरातील सर्व दागिने चोरले. दुर्गंधी पसरू नये आणि गुन्हा उघडकीस येण्यास उशीर व्हावा म्हणून त्यांनी मृतदेह रजया आणि ब्लँकेटने झाकले. घटनेनंतर, जमिनीवरील रक्ताचे डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रथम पाणी आणि फ्लोअर क्लिनरचा वापर करण्यात आला, आणि नंतर रक्ताचे डाग पूर्णपणे पुसण्यासाठी जमिनीवर तेल ओतण्यात आले. घटनेनंतर, ते दोघे अभिषेकच्या दुकानात गेले. तिथे दागिन्यांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मित्राने अभिषेकची हत्या केली.
अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित
पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केल्याचा दावा केला असला, तरी अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. घटनास्थळी सापडलेल्या एका कार्डबोर्डवर "बंटी, बबली आणि सून यांनी हत्या केली" असा मजकूर लिहिलेला होता. पोलिसांच्या मते, तपास दिशाभूल करण्यासाठी अभिषेकनेच ही चिठ्ठी लिहिली होती. मात्र, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या तपासानंतरही ही चिठ्ठी सुरुवातीला कशी दुर्लक्षित राहिली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याशिवाय, सनीने तब्बल 12 तास घरात राहून रक्ताचे डाग साफ करण्यासाठी डिटर्जंट, फ्लोअर क्लिनर आणि टॉयलेट क्लिनरचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृतदेह घरातच असताना पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न का करण्यात आला, हे स्पष्ट झालेले नाही.
तसेच, दाट लोकवस्तीच्या भागात संपूर्ण रात्र मृतदेहांसोबत घरात राहण्याचे धाडस सनीने कसे केले, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, सनीचा भाऊ त्याच्या बेपत्ता होण्याची माहिती पोलिसांना देऊनही योग्य कारवाई न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रयागराजमधील हे हत्याकांड उत्तर प्रदेशातील अलीकडच्या काळातील सर्वात धक्कादायक आणि गूढ गुन्ह्यांपैकी एक मानले जात असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे प्रश्न आणि नवे धागेदोरे समोर येत आहेत.