दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
'मंत्र्यांना हटवा, परीक्षा पारदर्शक करा'; लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप
मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. NEET-UG पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
सोनम वांगचुक यांचे उपोषण आज 19 व्या दिवशी पोहोचले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणामुळे त्यांचे सुमारे 8.9 किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे. ते 28 जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली आंदोलन करत आहेत.
सोशल मीडियावरील पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी म्हटले की, वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये कोणतेही गैर नाही. संबंधित मंत्र्याला पदावरून दूर करणे आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे, हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. NEET परीक्षेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला असून, सध्या भाजपकडे प्रश्न विचारू नयेत, असा अहंकार निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.
वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत मिळणाऱ्या माहितीमुळे चिंता वाढत असल्याचे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारने केवळ एका व्यक्तीकडे दुर्लक्ष केलेले नसून देशातील आंदोलनाच्या लोकशाही परंपरेलाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत काही माध्यमांवर सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाने सकारात्मक भूमिका घेतली होती. 2018 मधील री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्समध्ये त्यांना आमंत्रित करून अपारंपरिक ऊर्जेवरील त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा, दोन लोकसभा मतदारसंघ आणि स्थानिकांच्या जमिनींचे संरक्षण या मागण्यांवर त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
परीक्षा प्रक्रियेत सातत्याने होणाऱ्या गैरप्रकारांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी व्यापम घोटाळ्यापासून ते NEET आणि शिक्षक भरती परीक्षांमधील पेपरफुटीपर्यंत अनेक घटनांचा संदर्भ दिला. या सर्व घटनांमागे सत्तेचा गैरवापर आणि यंत्रणांवर नियंत्रण असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपच्या घटक पक्षांनाही स्वतंत्र अस्तित्व नसल्याची टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली. NEET परीक्षेतील गोंधळ हा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक विषय असून, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे ही केंद्र सरकारची संकुचित भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले.
कोण आहेत सोनम वांगचुक?
सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध भारतीय मेकॅनिकल इंजिनिअर, नवोन्मेषक, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी आहेत. लडाखमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे ते संस्थापक संचालक म्हणून ओळखले जातात. 2009 मधील 'थ्री इडियट्स' चित्रपटातील 'फुंसुक वांगडू' हे पात्र त्यांच्या जीवनावर प्रेरित असल्याचे मानले जाते. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून त्यांनी 'आइस स्तूप' हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले. त्यांच्या कार्याची दखल घेत 2016 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.