आजच्या आधुनिक युगातील लोकांनी मान्य केलेले महत्त्वाचे पेय म्हणजे चहा होय.
चहा प्या, पण काचेच्या किंवा चिनी मातीच्या कपातच — गजानन मुलंगे
रिसोड (World Tea Day) : आजच्या आधुनिक युगातील लोकांनी मान्य केलेले महत्त्वाचे पेय म्हणजे चहा होय. मे महिन्यामध्ये चहाचे उत्पादन सर्वाधिक होते म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ मे हा ‘जागतिक चहा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. आप्तस्वकियांमधील प्रेम द्विगुणीत करण्याकरिता चहा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, हे तेवढेच खरे. त्यामुळे कमी साखर व मर्यादित स्वरूपात सेवन केलेला चहा मानसिकदृष्ट्या हितकारक आहे, असे मत पर्यावरण प्रेमी गजानन मुलंगे यांनी व्यक्त केले. आपल्या स्वतःच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक चहा दिन’ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना मुलंगे यांनी चहा पिण्याच्या चुकीच्या पद्धतींवर बोट ठेवले. एकत्रित चहा घेताना अनेक समस्यांचे निराकरण जरी होत असले, तरी आपण चहा स्थलांतरित करताना प्लास्टिक पिशवी तसेच चहा पिताना कागदी कपांचा (Paper Cups) वापर करून दुर्धर आजारांना निमंत्रण देत आहोत, असे त्यांनी सांगितले.
कागदी कपाला कडकपणा व टिकाऊपणा आणण्यासाठी ‘बीपीए’ (BPA - बिस्फेनॉल-ए) नामक रसायनाचा उपयोग केला जातो. या कपामध्ये गरम चहा ओतल्यास हे रसायन चहामध्ये विरघळते आणि शरीरात शिरकाव करते. यामुळे कळत-नकळत आपण कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडतो, यात तिळमात्र शंका नाही. याशिवाय वापरून भिरकावलेल्या चिकट कागदी कपामुळे जागोजागी दुर्गंधीयुक्त ढीग निर्माण होत असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
या कार्यक्रमाकरिता रिसोडचे नायब तहसीलदार विजय देशपांडे, मयूर नकवाल, स्वप्निल इरतकर, नगर परिषद सदस्य सागर डांगे आणि श्री शिवाजी विद्यालय मोपचे प्राचार्य शरद टेमधरे प्रामुख्याने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदन चौधरी, श्रावणी बरडे, दिया बरडे, कावेरी मुलंगे, लक्ष्मी मुलंगे, माधवी मुलंगे, अरुणा थोरात, मंदा थोरात आणि नंदा गांजरे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत थोरात यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेश्वर मुलंगे यांनी मानले.
“चहा घ्या! पण चिनी मातीच्या किंवा काचेच्या कपामध्येच घ्या. आमचं ठरलं! आपणही ठरवा आणि रोगमुक्त व भयमुक्त जीवन जगा.”
— गजानन मुलंगे, पर्यावरण प्रेमी