शहरातील भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्याने तसेच इंधन दरवाढीचा परिणाम बाजारभावावर होत असून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.
भाव दुप्पट-तिप्पट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले; धान्य व खाद्यतेलही महागले
हिंगोली (Vegetable Price Hike) : शहरातील भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्याने तसेच इंधन दरवाढीचा परिणाम बाजारभावावर होत असून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. दहा रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आता ३० ते ४० रुपये किलो झाले आहेत, तर १५ ते २० रुपये पाव मिळणारा शेवगा ३० ते ४० रुपये पाव दराने विकला जात आहे.
हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातील मुख्य भाजीमंडईत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्थानिक शेतमालाचे उत्पादन घटले असून परजिल्ह्यातून येणारा भाजीपाला महाग झाल्याने किरकोळ बाजारातील दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
मेथी आणि कोथिंबिरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रतिजुडी २० ते ४० रुपये दराने विक्री होत आहे. इतर पालेभाज्यांचे दर स्थिर असले तरी प्रतिजुडी १० रुपये दर कायम आहे. फळभाज्यांच्या दरातही प्रतिकिलो ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या बाजारात कांद्याची पात १५ ते २० रुपये, पालक व अंबाडा १० रुपये जुडी, वांगी ५० ते ६० रुपये, दोडका ७० ते ८० रुपये, गवार ६० रुपये, कारले ५० ते ६० रुपये, टोमॅटो ३० ते ४० रुपये, कांदा १५ ते ३० रुपये, बटाटा २० ते ३० रुपये, लसूण १०० ते १८० रुपये, कोबी १० ते २० रुपये तर फुलकोबी १५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेते प्रल्हाद गिरी व सय्यद शौकत यांनी दिली.
व्यापाऱ्यांच्या मते, कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला पिके करपली असून स्थानिक आवक जवळपास निम्म्याने घटली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या मालाचा वाहतूक खर्च वाढल्याने दर आणखी वाढले आहेत. “मागणी कायम आहे, पण माल कमी येतोय. त्यामुळे भाव वाढले आहेत,” असे एका घाऊक व्यापाऱ्याने सांगितले.
खरीप हंगाम जवळ आल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके काढून त्या ठिकाणी मशागतीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे नियमित भाजी मंडईत येणारा माल कमी झाला असल्याचे अंधारवाडी येथील भाजी विक्रेते बळीराम खुडे यांनी सांगितले. ते भाजी मंडईत आंबे विक्रीसाठी आले होते.
जिल्हाभरातून भाजीपाल्याची आवक घटल्याने परजिल्ह्यातून भाज्या आणाव्या लागत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
फळांचे दरही वाढले
बाजारात सफरचंद १८० ते २०० रुपये, पेरू ८० रुपये, मोसंबी ८० ते १२० रुपये, चिकू ६० ते ८० रुपये, द्राक्ष १०० ते ११० रुपये, डाळिंब १०० ते २५० रुपये, आवळा १२० ते १५० रुपये, अननस १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. तर कलिंगड ६० ते १०० रुपये नगाप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती विक्रेते शेख सत्तार यांनी दिली.
फुलांच्या दरातही तेजी
सध्या बाजारात विविध प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध असून निशिगंध २५० ते ३०० रुपये, गलांडा १५० ते २०० रुपये, शेवंती २०० ते ३०० रुपये तर गुलाब २५० ते ३५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याचे फुलविक्रेते उमेश गुंजकर यांनी सांगितले.