डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ साली कोल्हापूरला झाला.
मान्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक
नागपूर (Vasant Gowarikar) : अवकाश, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात संशोधन करून अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर हे देशातील मूलभूत समस्यांची जाण असलेले आणि त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ होते. भारत संपूर्ण साक्षर होण्याची गरज आहे व सर्वांना पुरून उरेल एवढी ऊर्जा निर्माण करायला हवी असे म्हणणाऱ्या गोवारीकर यांनी कल्पनेतला प्रगत भारत प्रत्यक्षात यावा म्हणून शास्त्रज्ञाच्या रूपात मोठे योगदान दिले.
त्यांची २५ मार्च रोजी जयंती आहे. डॉ. गोवारीकर यांना मान्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून सारा देश ओळखतो. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केली व त्यानुसार दरवर्षी मे महिन्यात आगामी मान्सूनचे भाकीत वर्तवण्यात येते. ते बहुतांशी अचूक ठरल्याने, समस्त भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठीच मदत मिळाली आहे.
डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ साली कोल्हापूरला झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातच झाले.
एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त केली. ११ व्या वर्षीच चरख्याच्या पेळूतून धागा निघताच आपोआप गुंडाळला जाण्याची नवी पद्धत शोधली होती. वयाच्या २८ व्या वर्षी केंब्रिज, ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे अमेरिकेत समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलवून घेण्यात आले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये १९६५ पासून डॉ. गोवारीकर विक्रम साराभाई यांच्यासोबत उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले. त्याचे फलित म्हणजे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आज ते अव्वल समजले जातात. ते नंतर त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे १७ एप्रिल १९८३ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली एसएलव्ही-३ हा उपग्रह वाहक कार्यान्वित झालावतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपटली. १९८६-१९९१ या काळात ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. २ जानेवारी २०१५ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.