खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डिझेल मिळण्यात येत असलेल्या अडचणींची दखल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी गांभीर्याने घेतली.
प्रशासन हलले; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी
चिखली (Shweta Mahale Patil) : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डिझेल मिळण्यात येत असलेल्या अडचणींची दखल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी गांभीर्याने घेतली. शेतकऱ्यांच्या या समस्येवर केवळ पत्रव्यवहार न करता आमदार महाले पाटील यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेत संबंधित अधिकारी व पेट्रोल पंप चालकांची बैठक बोलावली.
या बैठकीत डिझेल टंचाईची कारणे, साठेबाजीचे प्रकार आणि शेतकऱ्यांना होत असलेली गैरसोय यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सक्रिय भूमिका घेतल्याबद्दल आमदार महाले पाटील यांच्या कार्याची जिल्ह्यात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
बैठकीत अपेक्षित तोडगा न निघाल्याने आमदार श्वेता महाले पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना अधिकृत बॅरल व कॅनमधून डिझेल पुरवठा उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली. शेती मशागती, पेरणी, ट्रॅक्टर, पंप व इतर कृषी कामांसाठी डिझेलची नितांत गरज असताना अनेक पेट्रोल पंपांवर वाहनाशिवाय डिझेल न देण्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांनी दि. २२ मे २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके तैनात करण्याचे आदेश जारी केले आहेत.


या आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी प्राधान्याने इंधन उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य ग्राहकांना सुरळीत इंधन पुरवठा करणे, साठेबाजी व खोट्या ‘नो स्टॉक’ फलकांवर कठोर कारवाई करणे तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर आयटी अॅक्ट अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार आणि डीवायएसपी यांनी दररोज पेट्रोल पंपांना अचानक भेटी देऊन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “शेतकरी बांधवांना खरीप हंगामात डिझेलसाठी वणवण करावी लागू नये यासाठी सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. बैठका, पत्रव्यवहार व प्रत्यक्ष पाठपुरावा यामुळे प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केली. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.”
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्यापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यापर्यंत आमदार श्वेता महाले पाटील यांनी दाखवलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना खरीप हंगामात सुरळीत इंधन पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच लवकरच परिस्थिती पूर्ववत होऊन भारत विकासाच्या दिशेने आगेकूच करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.