बीड जिल्ह्यातील मातोरी गावात एका पीएसआय अधिकाऱ्याच्या लग्नाशी संबंधित प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे.
लग्नाआधी मोठा ट्विस्ट; PSI वर फसवणूक आणि धमकीचा आरोप, परस्परविरोधी तक्रारी दाखल**
बीड (PSI Fraud Case) : बीड जिल्ह्यातील मातोरी गावात एका पीएसआय अधिकाऱ्याच्या लग्नाशी संबंधित प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, मंडप सजला होता, मात्र ऐनवेळी नवरदेव ठरलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) लग्नास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिस तपास सुरू आहे.
लग्नाची तयारी पूर्ण, पण अचानक नकाराचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित PSI पवन निंबाळकर यांचे लग्न निश्चित झाले होते. कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात लग्नाची खरेदी, साखरपुडा आणि इतर सर्व तयारी केली होती. मात्र लग्न काही दिवसांवर आले असताना नवरदेवाने अचानक लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप नवरीच्या कुटुंबीयांनी केला आहे.नकार देण्यामागे काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झाले नाही .परंतु त्यांनी पैश्यांच्या हव्यासापोटी असे कृत्य केले ,असे सांगण्यात येत आहे .या निर्णयामुळे नवरीच्या कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले असून, लाखो रुपये लग्नाच्या खरेदी, दागिने आणि कार्यक्रमावर खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
गंभीर आरोप: फसवणूक आणि धमकीचा उल्लेख
नवरीच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीत असा आरोप आहे की, PSI पवन निंबाळकर यांनी लग्नाचे आमिष दाखवून सोने, कपडे आणि इतर साहित्य घेतले आणि नंतर लग्नास नकार देत फसवणूक केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात संबंधित PSI विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारी
या प्रकरणाला वेगळे वळण देणारी बाब म्हणजे, PSI पवन निंबाळकर यांच्या भावानेही नवरीच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी चुकीची माहिती देऊन जाळ्यात ओढले आणि फसवणूक केली. हे दोन्ही परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चकलांबा पोलीस स्टेशन येथे दोन्ही तक्रारींच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. लग्नासारख्या सामाजिक प्रसंगात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून तपासातून पुढील सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.