दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका वीज वितरण यंत्रणेसह पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे.
हिंगोलीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
हिंगोली (Power Failure) : दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका वीज वितरण यंत्रणेसह पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे. पावसादरम्यान 33 केव्ही वीजवाहिनीवर वीज कोसळल्याने इन्सुलेटर फुटला आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सदर वाहिनीवरील बिघाड शोधून रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम घेत वीजपुरवठा पूर्ववत केला.
वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सिद्धेश्वर येथील पाणीपुरवठा योजनेची मोटर सुरू करण्यात आली. मात्र, जवळपास दोन तास पंप सुरू असूनही पाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी मोटर व मुख्य जलवाहिनीची पाहणी केली असता पंप व मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.
सदर बिघाडाची माहिती तात्काळ संबंधित तांत्रिक विभागास कळविवण्यात आली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच सिद्धेश्वर व परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.