अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पातुर नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून १८ मे २०२६ पासून उमेदवारी अर्ज (नामांकन) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त; निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुविधांचा बोजवारा
पातुर (Municipal Election) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पातुर नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून १८ मे २०२६ पासून उमेदवारी अर्ज (नामांकन) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सर्व प्रक्रिया नगरपरिषद कार्यालय, पातुर येथे पार पडत आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान पातुर नगरपालिकेचा कमालीचा नियोजनशून्य कारभार समोर आला असून, यामुळे नागरिकांमध्ये आणि इच्छुकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोयी-सुविधांचा मोठा अभाव
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पातुर नगरपरिषद कार्यालयात इच्छुकांची आणि समर्थकांची मोठी गर्दी होत आहे. असे असतानाही, पातुर नगरपालिकेने प्राथमिक सोयी-सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे विदारक चित्र आहे.
बैठक व्यवस्थेचा फटका
उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आणि भरण्यासाठी निश्चित केलेल्या हॉलमध्ये पुरेशा खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई
कडक उन्हाळा असतानाही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही.
पार्किंगचा गंभीर प्रश्न
निवडणुकीमुळे आधीच गर्दी उसळत असताना, नगरपालिकेच्या इमारतीसमोरच वाहनांची पार्किंग केली जात आहे. वास्तविक पाहता, निवडणुकीच्या काही दिवसांसाठी ही पार्किंग व्यवस्था तात्पुरती दुसऱ्या जागेवर हलवणे अत्यंत गरजेचे होते. परंतु तसे न केल्याने नगरपरिषद परिसरात प्रचंड कोंडी निर्माण होत आहे.
केवळ टेंडर काढण्यातच धन्यता?
“पातुर नगरपालिकेत सर्वसामान्य जनतेची कामे आधीच रेंगाळत पडली आहेत. आता निवडणुकीच्या नावाखाली विविध कामांचे टेंडर काढणे आणि ते मॅनेज करणे, एवढेच काम येथील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहिले आहे की काय?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासकांच्या भूमिकेकडे लक्ष
निवडणुकीसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या काळात पातुर नगरपरिषदेचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आता या सर्व ढिसाळ नियोजनावर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पातुर नगरपालिकेचे प्रशासक काय कारवाई करतात आणि या असुविधा तातडीने दूर होतात का, याकडे संपूर्ण पातुरकरांचे लक्ष लागले आहे.
— किरण निमकंडे, पातुर