शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीचा पक्का रस्ता म्हणजे पाणंद रस्ता.
पावसाळ्यात रस्ता होतो चिखलमय
भिवापूर/मालेवाडा (Muddy Roads) : शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीचा पक्का रस्ता म्हणजे पाणंद रस्ता. मातोश्री रस्ता योजनेतंर्गत पाणंद रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, मल्हारपुरच्या पाणंद रस्त्यावर मुरमाऐवजी माती मिश्रित पांढरी भिसचर वापर केला असून, योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
शेतकऱ्यांची तक्रार
भिवापूर तालुक्यातील घाबरला ग्रामपंचायत अंतर्गत मल्हारपूर येथे महादेव वराडे ते रोशन राऊत यांच्या शेतापर्यंत बाराशे मीटरचे मातीकाम व मजबुतीकरण मातोश्री पाणंद रस्ता योजनेत मंजूर झाले. रस्त्याचे मातीकाम झाल्यानंतर मजबुतीसाठी पक्का मुरूम पसरला जातो. परंतु, कंत्राटदार मुरमाऐवजी गावातीलच एका शेतकऱ्यांच्या शेतातील माती मिश्रीत पांढरी भीस रस्त्यावर टाकली. भिस टाकल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. जो पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी आहे. तोच पाणंद रस्ता त्रासदायक ठरला आहे. मुरमाऐवजी भिस पसरवून कामाचा दर्जा निकृष्ट करण्यासोबत कामात अनियमितता करण्यात आली.
त्यामुळे मल्हारपूर येथील पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी रामकृष्णा राऊत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतात किंवा नाल्यात उपलब्ध मुरूम टाकण्याची मुभा
दरम्यान, सहाय्यक अभियंता राहुल रागोर्ते यांना याविषयी विचारणा केली असता, सदर योजनेत गावालगत एखाद्याच्या शेतात किंवा नाल्यात मुरूम उपलब्ध असल्यास तो रस्त्यावर टाकण्याची मुभा आहे, असे त्यांनी सांगितले.