आदिवासी बहुल आणि जंगलव्याप्त माहुर तालुक्यात १४ जुलैपासून महावितरणकडून रात्री ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
माहुर (नांदेड) : आदिवासी बहुल आणि जंगलव्याप्त माहुर तालुक्यात १४ जुलैपासून महावितरणकडून रात्री ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विंचू, विंगळी यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांसह बिबट, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचाही तालुक्यात वावर असल्याने रात्रीच्या भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी महावितरण प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत रात्रीचे भारनियमन तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.
दिवसभर उन्हात राबून आलेले शेतकरी, माय-माऊली, अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच व्यापारी यांना रात्रीच्या भारनियमनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्याचा बहुतांश भाग जंगलव्याप्त असून काही भाग पैनगंगा नदीच्या किनाऱ्यालगत आहे.
रात्रीच्या अंधारात हिंस्र वन्यप्राण्यांचा धोका वाढत असून, तालुक्यात यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सायंकाळच्या वेळेतील भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
भारनियमन अपरिहार्य असल्यास ते दुपारनंतर ते सायंकाळपूर्व कालावधीत करण्याचे नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल, अशी मागणीही त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
माहूरसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील जनतेला अघोषित अथवा दीर्घकाळ चालणाऱ्या भारनियमनामुळे वेठीस धरू नये आणि तातडीने योग्य निर्णय घेऊन सायंकाळच्या वेळेतील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी सूचनाही आमदार भीमराव केराम यांनी आपल्या पत्रातून केली आहे.