शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा महत्त्वाचा आधार ठरत आहे.
हिंगोली (Medical Assistance Fund) : शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा महत्त्वाचा आधार ठरत आहे. हिंगोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात ४८० रुग्णांना सुमारे ३ कोटी ८५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. तसेच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदी माध्यमांतून रुग्णालये, धर्मादाय संस्था, दाते आणि सामाजिक संस्थांचे सहकार्यही लाभत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या सुधारणा आणि विविध मदत मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढली असून मदत वितरणाचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (वय २ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात व गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघातातील जखमी, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले रुग्ण (बर्न केस), विद्युत अपघातातील रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी अलीकडेच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार असून, आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. याच कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील ४८० रुग्णांना सुमारे ३ कोटी ८५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे. सुधारित कार्यपद्धती, तातडीचे निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभ अधिक वेगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे.
अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.