Maharashtra ST Corporation: महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूकीविरूद्ध लढण्यासाठी गाड्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचा आरोप
लातूर (Maharashtra ST Corporation) : राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी आदेश दिले असले तरी त्यांचे आदेश आर. टी. ओ. व एसटी या दोन्ही विभागांनी अद्याप गंभीर घेतलेले दिसत नसून एस.टी. महामंडळाकडून अवैध वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या गाड्यांचा आर. टी. ओ अधिकाऱ्यांकडून सर्रास गैरवापर होत असून त्याला अभय देण्याचे काम एस.टी.चे काही अधिकारी करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्पष्ट आणि कठोर निर्देश दिले होते. मात्र, त्या सूचनांची स्थानिक स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र असून राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांपैकी केवळ २० कार्यालयांनाच एसटीकडून वाहन व चालक तसेच एक पर्यवेक्षक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही वाहने प्रत्यक्ष कारवाई ऐवजी काही ठिकाणी आर. टी. ओ. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली जात असल्याचे वास्तव उघडकीस आले असून त्याला एस.टी. अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असून दोघांच्या संगनमताने राजरोसपणे हे सुरू असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीचे काही अधिकारी व पर्यवेक्षक केवळ नावापुरती उपस्थिती लावून कारवाईचा दिखावा करत असून अवैध वाहतूकी संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती मिळावी यासाठी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे केलेल्या कारवाईचे फोटो व लेखी माहितीही (Maharashtra ST Corporation) एस.टी.च्या अनेक विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सादर केलेली नाही. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या मागील काही महिन्यांतील कामगिरीची चौकशी केल्यास अवैध वाहतूक रोखण्यासाठी एस.टी. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती आर. टी .ओ. ला देणे अपेक्षित असताना, त्यातही मोठ्या प्रमाणावर निष्क्रियता दिसून येत आहे. दुसरीकडे, आर.टी. ओ अधिकारी सुद्धा केवळ वरवरची कारवाई करून एस.टी.ने दिलेल्या संसाधनांचा व मनुष्यबळाचा गैरवापर करत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.