हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला.
नागपूर (Janata Darbar) : हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला. या दरबारात विविध समस्यांचा पाऊस पडत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.
यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अमजद शेख, नगरसेवक सन्नी चौहान, नगरसेविका जयश्री विनोद पाटील, करिश्मा संजय भुमरकर तसेच आई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सदस्य आयफाज शेख, शुभम कैकाडी आदींनी जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
जनता दरबारात प्रभागातील रस्ते, नाली, स्वच्छता यांसाठी निधी उपलब्ध करून देणे, रेल्वे अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन, अंडरपास किंवा अंडरब्रिजची उभारणी, हनुमान नगरमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देणे, नियमित पाणीपुरवठा करणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच आवश्यक ठिकाणी डीपी बसविणे, गॅस सिलेंडरचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आमदार समीर मेघे यांनी नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून त्यावर सकारात्मक कार्यवाही करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या जनसंपर्क आणि समस्यांप्रती असलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.