रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली.
रायगड (Double Murder) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून निगडोली गावात एका वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.या खुनामागे नेमके काय कारण आहे याचे स्पष्टीकरण अजून झालेले नाही परंतु या घटनेमुळे संपूर्ण खालापूर तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्ध दाम्पत्यांच्या मृत्यूचे काय कारण असावे याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे .
मृत दाम्पत्याची ओळख ७५ वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांच्या ७२ वर्षीय पत्नी सुरेखा फराट अशी झाली आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा नातू त्यांना वारंवार फोने द्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता .परंतु दोघेही फोन उचलत नसल्याने त्यांचा नातू घाबरला आणि त्यामुळे तो निगडोली येथील त्यांच्या घरी पोहोचला. मात्र घरात प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या घरात आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले होते.
धक्कादायक बाब म्हणजे, दोघांच्या मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आला होता. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातील दृश्य अत्यंत भीषण होते. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरील नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी चोरी, वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा दुहेरी खून झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत दाम्पत्य राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे नातेवाईक आहेत.
दरम्यान, अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. काही संशयित तांब्यात घेण्यात आले आहेत तर तपासामध्ये ६ पथके तैनात करण्यात आली आहे. या निर्घृण घटनेमुळे निगडोली गावात शोककळा पसरली असून वृद्ध दाम्पत्याच्या हत्येमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.