चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संताप शनिवारी रस्त्यावर उतरला.
मेरा चौकी येथे पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास रोखला; कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी
चिखली (Diesel Shortage): चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असतानाच निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संताप शनिवारी रस्त्यावर उतरला. मेरा खुर्द येथील नायरा पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याने जवळपास ५० ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळू शकले नाही. यामुळे संतप्त शेतकरी, ट्रॅक्टर चालक व मालकांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मेरा चौकी येथे पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे रोखली. “शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यात यावे”, “पेट्रोल पंपांवरील डिझेल टंचाई तातडीने दूर करावी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच चिखलीहून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणारी अँबुलन्स आंदोलनस्थळी पोहोचली. यावेळी आंदोलकांनी तत्काळ ट्रॅक्टर बाजूला करून अँबुलन्सला मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे आंदोलनाच्या काळातही आंदोलकांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून तालुक्यातील बहुतांश शेतकरी यांत्रिक शेतीवर अवलंबून आहेत. गावागावांत बैलांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र अशा यंत्रसामग्रीवर शेतीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत ऐन हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन व पोलीस विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ठाणेदार शक्करगे हे चिखली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेलेले असताना रास्ता रोकोची माहिती मिळताच तातडीने आंदोलनस्थळी पोहोचले.
प्रशासनाकडून पुढील दोन दिवसांत प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन-दोन डिझेल टँकर उपलब्ध करून देण्यात येतील तसेच डिझेल पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “दोन दिवसांत डिझेल पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाभर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.”
आंदोलनात गणेश थुट्टे, विनोद थुट्टे, भागवत थुट्टे, कृष्णा थुट्टे, शरद थुट्टे, विशाल थुट्टे, संदीप थुट्टे, समाधान थुट्टे, सतीश थुट्टे, अशोक थुट्टे, रामेश्वर शेळके, रामदास मुजमुले, आकाश पैठणे, दिपक गाडेकर, अंकुश देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे काही काळ पुणे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.