मुंबई विमानतळावर ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सहा तासांसाठी उड्डाण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई (Airport Maintenance Work) : मुंबई विमानतळावर ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सहा तासांसाठी उड्डाण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. प्री-मान्सून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन्ही रनवे बंद ठेवले जाणार असल्याने या कालावधीत विमानतळ पूर्णतः नॉन-ऑपरेशनल राहणार आहे.
या बंददरम्यान रनवे ०९/२७ आणि रनवे १४/३२ हे दोन्ही मार्ग बंद राहतील. दरवर्षीच्या मान्सूनपूर्व तयारीचा हा एक भाग असून, पावसाळ्यात सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १,०३३ एकर परिसरात पसरलेल्या एअरसायड क्षेत्राच्या देखभालीसाठी ही कामे महत्त्वाची आहेत. जगातील अत्यंत व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर संपूर्ण सेवा बंद ठेवण्याचा परिणाम लक्षात घेता, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच विमान कंपन्या आणि संबंधित घटकांशी चर्चा करून वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.
“मान्सून तयारी योजनेचा भाग म्हणून सर्व संबंधितांशी सहा महिने आधी समन्वय साधून विमान कंपन्यांना वेळापत्रकात आवश्यक बदल करण्याची संधी देण्यात आली,” असे MIAL कडून सांगण्यात आले.
यापूर्वीही विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला होता. ८ मार्च रोजी ६६ उड्डाणे (३२ आगमन, ३४ प्रस्थान) रद्द करण्यात आली होती. तर ३ मार्च रोजी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकूण १०७ उड्डाणे (५४ आगमन, ५३ प्रस्थान) रद्द झाली होती, ज्यामुळे अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता.