पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
85 टक्के भूभागावर नियंत्रण, स्वतंत्र ध्वज, चलन आणि प्रशासनाचा दावा; पाकिस्तानातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल पत्र चर्चेत
नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पत्रात बलुचिस्तानने पाकिस्तानपासून वेगळे होत स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रातील दाव्यांमुळे सोशल मीडियासह पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' या नावाने प्रसारित होत असलेल्या कथित निवेदनात बलुचिस्तानमधील बंडखोर गटाने प्रदेशाच्या सुमारे 85 टक्के भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. याच पत्राच्या आधारे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याच्या चर्चा वेगाने पसरत आहेत.
पत्रानुसार, बलुचिस्तानने स्वतःचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, स्वतंत्र चलन आणि प्रशासकीय व्यवस्था लागू केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या प्रदेशातील गॅस प्रकल्प, खनिज संपत्ती आणि कोळशाच्या खाणींवर नव्या बलुच प्रशासनाचा ताबा प्रस्थापित झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक बलुच नागरिकांनी आपल्या पदांचा राजीनामा देत स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्याचाही दावा या कथित पत्रामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण कायम आहे. मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांमुळे हा प्रदेश सातत्याने चर्चेत राहिला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये अनेक वेळा आंदोलने आणि निदर्शनेही करण्यात आली आहेत.
अलिकडच्या काही महिन्यांत या भागातील हिंसक घटनांमध्येही वाढ झाली आहे. बलुच बंडखोर आणि 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'शी संबंधित दहशतवादी गटांकडून पाकिस्तानी सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कर, फ्रंटियर कोर आणि पोलिसांनी 5 जुलैपासून 'ऑपरेशन शाबान' अंतर्गत संयुक्त कारवाई सुरू केली असून, या मोहिमेत आतापर्यंत 109 हून अधिक बंडखोर ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सोशल मीडियावर बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याचा दावा करणारे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.