महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टमुळे वादाची ठिणगी पडली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टमुळे वादाची ठिणगी पडली आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेसंदर्भातील व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडीया' असा केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.
काँग्रेसने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, "सुनेत्रा पवार, अजून किती दिवस 'गुंगी गुडीया' बनून राहतील?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पोस्ट करत ही टीका करण्यात आली.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फोनवरून प्रतिक्रिया देत काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. संबंधित पोस्ट तातडीने हटवावी आणि काँग्रेसने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
मिटकरी यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर तेच प्रश्न वारंवार विचारले जात असल्याने सुनेत्रा पवार यांनी बोलणे थांबवले होते. मात्र, काँग्रेसने त्या व्हिडिओचा विपर्यास करून चुकीचा अर्थ लावत टीका केल्याचा आरोप त्यांनी केला.
नेमका वाद कशामुळे?
महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याच संदर्भातून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख केला. या पोस्टनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
अमोल मिटकरींची काँग्रेसवर टीका
वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगितले. या वक्तव्याबद्दल काँग्रेसने तातडीने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींचा उल्लेख
काँग्रेसवर टीका करताना अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या महिला नेतृत्वाचाही संदर्भ दिला. देशाला इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांसारखे महिला नेतृत्व देणाऱ्या काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची हीन पातळीवरील भाषा वापरली जाणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.