भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर स्वर आज कायमचा शांत झाला आहे.
मुंबई (Suman Kalyanpur) : भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर स्वर आज कायमचा शांत झाला आहे. आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.
मराठी भावगीते, भक्तीगीते आणि हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या आवाजाने वेगळी ओळख देणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी अनेक अजरामर गीते रसिकांना दिली. त्यांच्या गायकीतील सहजता, शब्दोच्चारातील स्पष्टता आणि भावनांना स्पर्श करणारी शैली यामुळे त्या अनेक पिढ्यांच्या आवडत्या गायिका बनल्या.
बांगलादेशात जन्म, संगीताची लहानपणापासून आवड
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन अविभाजित भारतातील भवानीपूर (सध्याचा बांगलादेश) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. संगीताची आवड आणि अभ्यास यामुळे त्यांनी अगदी लहान वयातच गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात त्या ‘सुमन हेमाडी’ या नावानेच गाणी गात असत.
तलत महमूद यांनी दिली पहिली संधी
सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीला दिशा देण्यात ज्येष्ठ गायक तलत महमूद यांचा मोठा वाटा होता. एका जाहीर कार्यक्रमात त्यांचे गायन ऐकल्यानंतर तलत महमूद यांनी त्यांच्या आवाजातील विलक्षण गोडवा ओळखला आणि चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत सुमनताईंनी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले.
मराठी भावगीतांच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. ज्येष्ठ साहित्यिक ग .दि . मांगुळकर यांच्या गीतांना त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केले.
अनेक भाषांमधील हजारो गाणी
सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदी भाषांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कन्नड आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गीते गायली. भावगीते, भक्तीगीते, गझल, ठुमरी आणि चित्रपटगीते अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायनाची छाप उमटवली.
पद्मभूषण सन्मानाने गौरव
भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने 2023 मध्ये त्यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. हा सन्मान त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध संगीत प्रवासाची पोचपावती मानला जातो.