राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
(SSC Result 2026 Maharashtra) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही यंदा सुमारे २ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी दुपारी १ वाजताची वेळ जाहीर करण्यात आली होती, मात्र वेबसाइटवरील वाढत्या ट्रॅफिकचा विचार करून बोर्डाने वेळेत बदल केला.
मुलींची पुन्हा आघाडी
यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
- मुलींचा निकाल: ९४.९६%
- मुलांचा निकाल: ९०.५६%
विभागनिहाय निकाल
राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
- कोकण: ९७.६२% (सर्वाधिक)
- कोल्हापूर: ९५.४७%
- मुंबई: ९४.९७%
- पुणे: ९४.२४%
- अमरावती: ९०.५०%
- नाशिक: ९०.५३%
- नागपूर: ८९.०७%
- लातूर: ८८.४२%
- छत्रपती संभाजीनगर: ८८.४१% (सर्वात कमी)
निकाल कसा पाहाल?
विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल:
- sscresult.mahahsscboard.in
- mahahsscboard.in
- results.digilocker.gov.in
- results.targetpublications.org
- results.navneet.com
निकाल पाहण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जाऊन SSC Examination March 2026 Result या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर सीट नंबर आणि आईचे नाव (इंग्रजीत) टाकून ‘View Result’ वर क्लिक करावे.
एसएमएसद्वारे निकाल
इंटरनेट उपलब्ध नसल्यास विद्यार्थी मोबाईलवरूनही निकाल पाहू शकतात.
मोबाईलमध्ये MHSSC <Seat Number> असा मेसेज टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवावा.
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कामकाजाच्या दिवसांत विहित शुल्कासह अर्ज करणे आवश्यक राहील.
दरम्यान, राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.