MLA Santosh Bangar: हिंगोली, परभणी, व नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी संतोष बांगर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हिंगोली (MLA Santosh Bangar ) : हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला ताकद मिळावी म्हणून संतोष बांगर यांची मंत्रिपदी नियुक्ती होणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपताच शिवसेने तर्फे राज्यात भाकरी फिरविली जाणार असल्याची चर्चा मुंबईपासून सुरू झाली आहे. या अंतर्गत राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना अर्धचंद्र मिळणार आहे. मंत्रिपद असून देखील ज्यांना आपल्या जिल्ह्यात पक्षासाठी फार काही करता आले नसेल अशा नेत्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याउलट हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख तथा कळमनुरीचे आमदार असलेल्या संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी नगरपालिका निवडणुकीतही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तीन नगर पालिका असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व कळमनुरी या दोन्ही नगरपालिका आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या ताब्यात आहेत.
नगरपालिका निवडणुकी दरम्यान विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना आ.संतोष बांगर यांनी भाजपकडे वळू न देता आपल्या पक्षात घेतल्याने मुंबई दरबारी त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. शिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अनेक ग्रामीण भागातील इतर पक्षांचे नेते शिवसेनेत दाखल होणार आहेत. यातील विधानसभा पातळीच्या काही नेत्यांची आ. बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घालून दिली आहे. या पृष्ठभूमीवर राज्य मंत्रिमंडळात होणारे फेरबदल पाहता हिंगोली परभणी व नांदेड ह्या तीन जिल्ह्यांना ताकद देण्यासाठी एकनाथ शिंदे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना संधी देतील असा अनेकांचा अंदाज आहे. याबाबत पक्ष पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून आमदार बांगर यांचे अनेक समर्थक आप आपल्या पद्धतीने वरिष्ठां कडे याबाबत मागणी करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाकडे तीन जागा आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन पैकी कळमनुरी ही एकमेव विधानसभा शिवसेनेकडे आहे; तर परभणी जिल्ह्यात मात्र शिंदेसेनेचे अद्याप खातेही उघडलेले नाही. परभणी जिल्ह्यातील बहुतांश बडे नेते आज घडीला भारतीय जनता पक्षात आहेत. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडे पाच आमदार आहेत शिवाय अशोक चव्हाण सारखा बडा नेता भाजपकडे आहे. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने दोन राज्यसभेचे खासदार दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात रामराव वडकुते यांना राज्य सभेची खासदारकी देण्यात आली आहे; तर काँग्रेस मधून आलेल्या प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने २०२९ करिता ही तयारी चालविली असल्याने विरोधी पक्षांसहित भाजपच्या मित्र पक्षांच्या ऊरातही धडकी भरत आहे.