उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला असून काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यतेमुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत हालचालींना वेग; ‘ऑपरेशन टायगर’नंतर ठाकरे गटात खळबळ, पाच खासदार बैठकीला अनुपस्थित
(Party Split Rumours) उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला असून काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यतेमुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा आरोप केला जात असून या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या पक्षातील सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती.
या बैठकीनंतरही परिस्थिती शांत न राहता उलट नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी हालचाली करत असून त्याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या खासदारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही खासदार लवकरच स्वतंत्र गटाची घोषणा करू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाकडून सर्व खासदार पक्षासोबतच असल्याचा दावा करण्यात आला आहे. “ऑपरेशन टायगर काहीही नाही” असा प्रतिप्रत्यय देत, उलट आम्ही “ऑपरेशन लांडगा” सुरू करू, असे संजय राऊत यांनी म्हटल्याचेही समोर आले आहे. मात्र त्याचवेळी काही खासदार वेगळ्या दिशेने हालचाली करत असल्याची चर्चा थांबलेली नाही.
दिल्लीत सुरू असलेल्या या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत तातडीने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. पक्षातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. या अनुपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांबाबत अधिक चर्चा सुरू झाली असून पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.