Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
संघर्षामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला;
विनायक सरनाईक यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक
चिखली (Mumbai loan waiver Andolan) : मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्याने चिखली तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे शेतकरी चळवळीच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आंदोलनाच्या लढ्याची आठवण करून दिली आहे.
सरनाईक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला विधानभवनासमोर आंदोलन केल्याचा अभिमान आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मुंबई येथे आंदोलन केले. आमची एकच मागणी होती—शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्त करा, २०१९ च्या कर्जमाफीतून वगळलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करा आणि शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या." ते पुढे म्हणतात की, आंदोलन पेटल्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली, आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले. "पण आम्ही घाबरलो नाही, कारण हा लढा आमच्या अन्नदात्यांच्या सन्मानासाठी होता," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर २०१९ च्या (Mumbai loan waiver Andolan) कर्जमाफीतून वगळलेल्या लाखो शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मर्यादा न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली. त्यामुळे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याची भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक सरनाईक म्हणाले की, मुंबईतील आंदोलनामुळे (Mumbai loan waiver Andolan) शासनावर लोकदबाव निर्माण झाला आणि त्यातूनच हा निर्णय शक्य झाला. हा विजय केवळ एका संघटनेचा नसून राज्यातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या शेतकरी, कार्यकर्ते आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचा आहे. चिखली तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या त्याग आणि संघर्षाचे हे यश असून, या निर्णयामुळे शेतकरी चळवळीला नवे बळ मिळाले आहे.
सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करत उर्वरित मागण्यांवरही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी संघटित राहून आपल्या हक्कासाठीचा लढा पुढेही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई आंदोलनानंतर झालेल्या या निर्णयामुळे चिखली तालुक्यासह राज्यभरातील शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, संघर्षातूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो, हा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.