Offline Exams Protest: लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी समन्वय समितीने ऑफलाईन परीक्षांचे मागणी, उमेदवारांच्या वयोमर्या व लघुलेखक पदांसाठी शासनाला धडकेला सांगितले.
लातूरमध्ये विद्यार्थी समन्वय समितीचा विराट मोर्चा
लातूर (Offline Exams Protest) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच इतर स्पर्धा परीक्षा सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) ऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात यासह प्रमुख मागण्यांसाठी लातूरमध्ये शुक्रवारी (दि.१०) विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थी समन्वय समितीच्यावतीने लातूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकला. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाईन घेण्यात यावी, पोलीस भरतीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा वाढविण्यात यावी, तसेच शासनातील लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदे पुन्हा सुरू करण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसाठी लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी लातूर शहरात विराट धडक मोर्चा काढण्यात आला.
आंबेडकर पार्क येथून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा (Offline Exams Protest) मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये विद्यार्थी समन्वय समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सीबीटी पद्धतीमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी, परीक्षा केंद्रांपर्यंतचा प्रवास, सर्व्हर समस्या आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने एमपीएससीसह सर्व स्पर्धा परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. टीईटी परीक्षाही ऑफलाईन घेऊन सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढविण्याची मागणी
पोलीस भरती प्रक्रियेला विविध कारणांमुळे झालेल्या विलंबामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर जात असल्याने भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. याशिवाय शासनाच्या विविध विभागांमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली लघुलेखक पदे पुन्हा सुरू करून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली.
मोर्चादरम्यान शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या. या (Offline Exams Protest) आंदोलनात विद्यार्थी समन्वय समितीचे पदाधिकारी, सदस्य, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो युवक-युवती उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!
मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थी समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी दिला.