राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सत्तेत सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटींनंतर राजकीय चर्चांना उधाण; रवी राणा यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा दावा केला
मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सत्तेत सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी व्हायचे असल्यास ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच व्हावे, असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.
यापूर्वी दिवंगत नेते तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तो विषय आता आमच्यासाठी संपला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते. तरीही, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य सत्ताप्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला आहे. या विस्तारात फुटीर खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होण्याची चर्चा असून, अर्थ खाते जयंत पाटील यांना देण्याच्या दृष्टीनेच ते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा राज्यातील सत्तेत सहभाग होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला NDAमध्ये सहभागी करून घेण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला अधिक प्राधान्य देण्याच्या भूमिकेत आहे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपसोबत आल्यास प्रत्येकी एक केंद्रीय मंत्रिपद देण्याबाबत भाजप नेतृत्व सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या भूमिकेत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीत तसेच केंद्रातील NDA सरकारमध्ये संभाव्य सहभागास अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, महायुतीचे आमदार रवी राणा यांनी येत्या 15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येतील, असा दावा केला आहे. राजकारणात अशक्य वाटणाऱ्या अनेक घटना घडल्या असून त्यामुळे हेही शक्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होतील, तर राज्यातील नेतृत्वाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती असतील, असा दावाही त्यांनी केला.