Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > पुणे

Nasrapur Case

नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ गुन्हा म्हणत न्यायालयाचे कठोर निरीक्षण

नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले.


नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात भीमराव कांबळे दोषी ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ गुन्हा म्हणत न्यायालयाचे कठोर निरीक्षण

Nasrapur Case |

पुणे सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; शिक्षेबाबतचा अंतिम निकाल 29 जून रोजी, सरकारी पक्षाची फाशीची मागणी

पुणे (Nasrapur Case) : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात गुरुवारी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीविरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले असून, या प्रकरणातील शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय 29 जून रोजी सुनावला जाणार आहे. या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या प्रकरणाचा उल्लेख ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये केला.

राज्यात मोठी खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी अत्यंत वेगाने पार पडली. गुन्हा घडल्यानंतर अल्पावधीतच तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर खटल्याची सुनावणीही प्राधान्याने घेण्यात आली. अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवण्याचा निर्णय जाहीर केला.

निकाल जाहीर करताना न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्यास सांगितले आणि त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीशांनी आरोपीला उद्देशून, "तुझ्यावरील सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. आता तुला या घटनेबाबत काय सांगायचे आहे आणि तुझ्या मते तुला कोणती शिक्षा व्हायला हवी?" असा प्रश्न विचारला.

यावर भीमराव कांबळे याने पुन्हा एकदा आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित मुलीला आपण गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी स्वतःचा तोल जाऊन आपण पडलो आणि त्याच वेळी मुलीच्या डोक्यालाही दुखापत झाली. ती सतत रडत असल्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, असा दावा त्याने न्यायालयात केला.

मात्र न्यायाधीशांनी त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले की, त्याने सांगितलेली कथा आता अप्रासंगिक ठरली आहे, कारण न्यायालयात त्याच्यावरील गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का, असे विचारण्यात आले. मात्र यावेळी आरोपीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायालयाने त्याला खाली बसण्यास सांगितले.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीसाठी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली. सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आरोपीच्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत भयावह असल्याचे सांगितले. विश्वासाने त्याच्यासोबत गेलेल्या निष्पाप चिमुरडीवर अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणी अहवालांमध्ये पीडितेवर विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

सरकारी पक्षाने पुढे नमूद केले की, आरोपीला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. गुन्हा घडल्यानंतरच्या त्याच्या हालचाली आणि तपासादरम्यानचे वर्तन यावरून त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

अजय मिसर यांनी आपल्या युक्तिवादात आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाचाही उल्लेख केला. यापूर्वी दोन गंभीर प्रकरणांमध्ये त्याचे नाव समोर आले होते. एका प्रकरणात नात्यातील मुलीवर अत्याचार केल्याचा तर दुसऱ्या प्रकरणात प्राण्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. अशा प्रकारच्या घटनांमुळे आरोपी हा समाजासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायालयानेही आपल्या निरीक्षणांमध्ये आरोपीच्या पूर्व इतिहासाचा उल्लेख केला. आरोपी यापूर्वीही दोन गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला होता. त्याच्या वर्तनामुळे गावकऱ्यांनी त्याला सामाजिकदृष्ट्या दूर ठेवले होते. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील त्याची साथ सोडल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सुनावणीदरम्यान आरोपीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीशी संबंधित वैद्यकीय अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. या अहवालांनुसार आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असून त्याला कोणताही मानसिक विकार नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचेही वैद्यकीय निष्कर्षांमधून समोर आले. त्यामुळे या संदर्भातील संभाव्य शंका दूर झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल देताना या गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले. पीडित चिमुरडीच्या शरीरावरील जखमा, तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे स्वरूप आणि त्यानंतर झालेली हत्या पाहता हा गुन्हा क्रूरतेच्या पराकाष्ठेचा असल्याचे त्यांनी म्हटले. निष्पाप बालिकेच्या न्यायहक्कासाठी न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भोर तालुक्याजवळील नसरापूर येथे 1 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरोधात भक्कम खटला उभा केला. अंतिम युक्तिवादात सरकारी पक्षाने हे सर्व पुरावे एकत्रितपणे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करतात, असा दावा केला होता.

न्यायालयाने गुरुवारी आरोपीला दोषी ठरवले असले तरी शिक्षेची घोषणा अद्याप बाकी आहे. आरोपीविरोधातील काही गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद असून, काही कलमांमध्ये आजन्म कारावास तसेच 14 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता 29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणात न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Related to this topic: