मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बोरिवली-अंधेरीदरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात हल्ला; आरोपीच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांची सहा पथके तैनात
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच जीवघेणा ठरला. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत तरुणाची ओळख मयंक लोहार (वय २२) अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २३ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धावणाऱ्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात घडली.
प्राथमिक तपासानुसार, मुसळधार पावसामुळे ट्रेनचा दरवाजा बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून मयंक लोहार आणि एका सहप्रवाशामध्ये वाद झाला. पश्चिम रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनुसार, या वादानंतर डब्यातील काही प्रवाशांनी संबंधित आरोपीला मारहाण केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून चाकू काढत मयंकच्या पोटावर अनेक वार केले. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मयंक डब्यातच कोसळला आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला.
काही प्रवाशांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातात चाकू असल्याने कोणीही पुढे जाऊ शकले नाही. दरम्यान, ट्रेन बोरिवली स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच आरोपी लोकलमधून उतरून फरार झाला.
रात्री सुमारे ११ वाजता ट्रेन बोरिवली स्थानकात दाखल झाल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी गंभीर जखमी झालेल्या मयंक लोहार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बोरिवली स्थानकावर भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी सहा विशेष पथके तैनात केली आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या रक्तरंजित घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, रेल्वे पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
::