बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या हॉटेलचालकाचा धारदार चाकूने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भांडण सोडवण्यासाठी धावलेल्या विलास घुले यांच्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींच्या अटकेसाठी रस्ता रोको, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी
केज (Kej Murder) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या हॉटेलचालकाचा धारदार चाकूने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कदमवाडी (टाकळी) फाटा परिसरातील 'हॉटेल गावकरी' येथे २० जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. गंभीर जखमी झालेल्या विलास नवनाथ घुले (वय ३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
माहितीनुसार, कदमवाडी फाटा येथे विलास घुले आणि आकाश चाळक यांच्या मालकीचे 'हॉटेल गावकरी' आहे. शनिवारी सायंकाळी आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश राजेंद्रप्रसाद शुक्ला हॉटेलमध्ये बसलेले असताना चारचाकी वाहन (एमएच ४४ झेड ९५४२) तेथे आले. या वाहनातून बाबासाहेब कदम, त्यांचा भाऊ मंगेश कदम, सासरे रामेश्वर गायकवाड (रा. सोनीजवळा, ता. केज) तसेच इतर नातेवाईक उतरले.
यावेळी "तू माझ्या पत्नींकडे का पाहतोस, तुला आज संपवतो," असे म्हणत बाबासाहेब कदम यांनी उमेश माने याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने धावत सुटला. त्याला वाचवण्यासाठी हॉटेलचालक विलास घुले आणि नितीन घुले हेही त्याच्या मागे गेले.
उमेशच्या पाठलागात बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड तसेच अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम हे सर्वजण धावत गेले. रेणू बारसमोरील बंद समर्थ बिअर बारजवळ त्यांनी विलास घुले आणि नितीन घुले यांना गाठून मारहाण केली. त्याचवेळी बाबासाहेब कदम यांच्या उपस्थितीत रामेश्वर गायकवाड याने विलास घुले यांच्या पोटात धारदार चाकू खुपसल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना प्रथम केज येथील शासकीय रुग्णालयात, त्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी (२१ जून) दुपारी सुमारे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर केज शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकासह राष्ट्रीय महामार्गावर दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. हत्येच्या चौथ्या दिवशीही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत न्यायाची मागणी कायम ठेवली.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे आणि आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, या घटनेची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (२३ जून) विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा विषय उपस्थित केला. हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करत खरा सूत्रधार शोधून सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी गृह विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून पोलिसांनी संशयित बाबासाहेब कदम याला ताब्यात घेतले आहे. फरार आरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.