Udgir Police Blood Donation: उदगीर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेटची भेट.
हेल्मेट भेट देत रक्तदानासोबत रस्ता सुरक्षेचाही दिला संदेश
उदगीर () : समाजासाठी केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी नव्हे, तर संकटात माणुसकीची ढाल बनणारी खाकी पुन्हा एकदा उदगीरकरांच्या मनात घर करून गेली. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून उदगीर शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेष म्हणजे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गाढे यांनी स्वतः रक्तदान करून “प्रत्येक सक्षम नागरिकाने रक्तदानासाठी पुढे यावे” असे आवाहन केले. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान करत सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
या (Udgir Police Blood Donation) शिबिरातील सर्वात आकर्षण ठरले ते म्हणजे प्रत्येक रक्तदात्याचा हेल्मेट देऊन करण्यात आलेला सन्मान! रोटरी क्लब लातूर यांच्या सहकार्याने रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. त्यामुळे “रक्तदानातून जीव वाचवा आणि हेल्मेटमुळे स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा” असा दुहेरी संदेश समाजापर्यंत पोहोचला. या उपक्रमाला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी भेट देत रक्तदात्यांचा सत्कार केला. तसेच भालचंद्र ब्लड बँक चे वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच शहर, ग्रामीण व उपविभागीय पोलीस कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. समाजासाठी रक्ताची नितांत गरज असताना उदगीर पोलीसांनी उभारलेले हे रक्तदान शिबिर म्हणजे केवळ उपक्रम नव्हे, तर माणुसकीचा जिवंत संदेश ठरला आहे.
“रक्ताच्या थेंबातून मानवता... हेल्मेटमधून सुरक्षिततेचा संदेश!”
“रक्तदान करून दुसऱ्याच्या शिरांत जीवनाचा प्रवाह सुरू करा आणि हेल्मेट घालून स्वतःच्या आयुष्याचे संरक्षण करा,” असा मानवता आणि सुरक्षिततेचा दुहेरी संदेश उदगीर पोलीस विभागाने आपल्या अभिनव उपक्रमातून दिला. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पुण्यकार्य आहे, तर हेल्मेट हे स्वतःच्या जीवाचे संरक्षण करणारे कवच आहे. ‘दुसऱ्याचा जीव वाचवा आणि स्वतःचाही जीव जपा’ हा संदेश रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आणि प्रत्येक हेल्मेटमधून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला. मानवतेची जाणीव आणि रस्ता सुरक्षेचे भान जागवणारा हा उपक्रम उदगीरकरांसाठी प्रेरणादायी ठरला.”रक्तदान करून दुसऱ्याच्या शिरांत जीवनाचा प्रवाह सुरू करा आणि हेल्मेट घालून स्वतःच्या आयुष्याचे संरक्षण करा; उदगीर पोलीसांच्या या उपक्रमाने समाजाला मानवतेसोबतच सुरक्षिततेचाही जिवंत संदेश दिला.”