Chikhli Akshaya Tritiya: चिखलीतील शेलगाव जहागीर येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन तंत्रज्ञान आणि परंपरागत संस्कृतीचे संमिश्रण पाहायला मिळाले.
शेताच्या बांधावर संस्काराची पेरणी!
चिखली (Chikhli Akshaya Tritiya) : चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेलगाव जहागीर येथील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ ठेंग यांच्या शेतात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. शेती, संस्कार आणि विज्ञान यांची सुंदर सांगड घालत या कार्यक्रमाने उपस्थित शेतकरी बांधवांना नवी दिशा दिली. या सोहळ्यास प्रगतिशील शेतकरी मा. हरीभिऊ येवले, अजय देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील सदस्य विनायक सरनाईक, कृषी सहाय्यक. किंगरे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गो-माता पूजन व माती पूजनाने करण्यात आली. ज्या धरतीमातेने आणि गो-मातेने आपल्याला अन्न-धान्य दिले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील माती एकत्रित करून तिचे वैज्ञानिक परीक्षण करण्याचा उपक्रमही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर आयोजित छोटेखानी शेतकरी सभेत शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, बदलती बाजारपेठ, सेंद्रिय शेती तसेच हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी एकमेकांचे अनुभव शेअर करत “एकमेकांच्या साथीने शेती समृद्ध करूया” असा निर्धार व्यक्त केला. गावातील शेतकरी गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अक्षय तृतीया हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे—या दिवशी केलेली सुरुवात सतत वाढत राहते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या दिवशी शेतीची मशागत, बियाणे खरेदी, पीक नियोजन यांसारख्या कामांना प्रारंभ करतात. भूमी पूजन, नांगर, बैल व शेतीसाधनांची पूजा करून भरघोस उत्पन्नासाठी प्रार्थना केली जाते. खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवातही याच काळात होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर शेलगाव जहागीर येथे झालेल्या या उपक्रमाने परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला.
“जो मातीला माय मानतो, तोच खरा वारकरी!”
गो-मातेच्या आशीर्वादाने आणि मायमातीच्या कृपेने बळीराजाच्या हाताला बळ मिळो, अशी प्रार्थना यानिमित्ताने करण्यात आली.