Chikhli Farmers' Crisis: सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून काही शेतांमध्ये कोळपणी सुरू आहे, काही शेतांमध्ये वखरणी करून पुन्हा जमीन तयार केली जात आहे, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीची धावपळ सुरू
चिखली तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात
चिखली (Chikhli Farmers' Crisis) : यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अभूतपूर्व आव्हानांचा ठरत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर आता निकृष्ट बियाण्यांच्या उगवणक्षमतेचा प्रश्नही उभा ठाकला आहे. परिणामी तालुक्यात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून काही शेतांमध्ये कोळपणी सुरू आहे, काही शेतांमध्ये वखरणी करून पुन्हा जमीन तयार केली जात आहे, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीची धावपळ सुरू आहे. एकाच तालुक्यात शेतीची तीन वेगवेगळी चित्रे पाहायला मिळत असून शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने (Chikhli Farmers' Crisis) शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. मात्र काही दिवसांतच पावसाने पुन्हा दडी मारली. त्यातच अनेक भागांत बियाण्यांची उगवण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या. अनेक शेतांमध्ये अपेक्षित उगवण न झाल्याने पिकांची संख्या अत्यंत कमी असून काही ठिकाणी संपूर्ण शेत रिकामे दिसत आहे.
विशेषतः सोयाबीन बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी पुढे येत आहेत. प्रमाणित बियाणे खरेदी करूनही उगवण न झाल्याचा आरोप अनेक शेतकरी करत आहेत. कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असून संबंधित शेतांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच पेरणीचा योग्य कालावधी संपत असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा निर्णय घ्यावा लागत आहे.
दुबार पेरणी म्हणजे केवळ पुन्हा बियाणे टाकणे नव्हे. त्यासाठी ट्रॅक्टरने वखरणी, नवीन बियाण्यांची खरेदी, खतांचा वापर, मजुरी, इंधन आणि औषधांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. आधीच शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला असताना हा अतिरिक्त आर्थिक बोजा अनेक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अनेकांनी कर्ज काढून शेती केली असून आता पुन्हा खर्च करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
दुसरीकडे, ज्या शेतांमध्ये उगवण चांगली झाली आहे तेथे तणांचे प्रमाण वाढल्याने कोळपणीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे तालुक्यात एकाच वेळी कोळपणी, वखरणी आणि दुबार पेरणी अशी तिन्ही प्रकारची कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गेल्या काही वर्षांत इतकी विस्कळीत परिस्थिती क्वचितच पाहायला मिळाली आहे.
बियाण्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न यंदा ऐरणीवर आला आहे. शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बाधित (Chikhli Farmers' Crisis) शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करण्याचे, उगवण कमी असल्यास तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तक्रारींची नोंद, पंचनामे आणि बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी यासाठी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी खरेदीची बिले, बियाण्यांच्या पिशव्यांवरील टॅग आणि इतर कागदपत्रे जतन करून ठेवावीत, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी तो कितपत समाधानकारक ठरेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत पाऊस न झाल्यास आणखी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रत्येक दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
यंदाचा खरीप हंगाम हा केवळ पावसाच्या अनिश्चिततेमुळेच नव्हे, तर बियाण्यांच्या गुणवत्तेवर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळेही चर्चेत आला आहे. निसर्गाची अवकृपा आणि बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत निर्माण झालेली शंका या दुहेरी संकटात चिखली तालुक्यातील बळीराजा अडकला आहे. शासनाने तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दुबार पेरणीसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा आता तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. खरीप हंगाम वाचविण्यासाठी त्वरित निर्णय घेतले नाहीत, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम आगामी काळात संपूर्ण कृषी व्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी आर्थिक खाईत; तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या: संतोष भुतेकर
चिखली तालुक्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ७ ते १० जूनदरम्यान अपेक्षित असलेला पाऊस तब्बल २२ ते २५ जूनदरम्यान आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर पाऊसही सर्वत्र समान न पडता काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. याशिवाय काही कंपन्यांच्या निकृष्ट व संशयित बियाण्यांमुळे उगवण क्षमता अत्यंत कमी राहिल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे केवळ ४४ एकरांवर दुबार पेरणी झाल्याची नोंद असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एका गावातच ५० ते ५० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी झालेली आहे. त्यामुळे शासकीय आकडेवारी आणि वास्तव यात मोठी तफावत असल्याचा आरोप युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा ईसरुळचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी केला आहे.
भुतेकर यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की, तलाठी, कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक यांच्या संयुक्त पथकांकडून तातडीने गावनिहाय सर्वेक्षण करून दुबार पेरणी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पंचनामे करावेत. नैसर्गिक आपत्ती आणि निकृष्ट बियाण्यांच्या फटक्यामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई जाहीर करावी. अन्यथा आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखी आर्थिक संकटात लोटला जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री तथा बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष भुतेकर यांनी केली आहे.