Latur Tawarja Project Canals: लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर पाणी सोडले गेले. शेतकऱ्यांना समाधान मिळाले, तर त्यांना अधिक दाबाने पाणी देण्याची मागणी आहे
अधिक दाबाने पाणी सोडण्याची मागणी
लातूर (Latur Tawarja Project Canals) : लातूर तालुक्यातील उटी खुर्द येथे असलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर पाणी सोडले असून सोमवारी हे पाणी आलमला शिवारात दाखल झाले. डाव्या कालव्याचे पाणी रविवारीच दाखल झाले होते. जलसंपदा विभागाच्या उशिराच्या का होईना या कामगिरीमुळे कालव्याखालील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या कालव्यांना तात्काळ पाणी सोडावे, यासाठी दैनिक 'देशोन्नती'ने वृत्त मालिका लावून पाठपुरावा तडीस नेला, याबद्दल देशोन्नतीचेही शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.

26 मे रोजीच्या अंकात दैनिक देशोन्नतीने 'पाणी सुटणार गडे' (Latur Tawarja Project Canals) कालवा दुरुस्ती पूर्णत्वाकडे!' वृत्त मालिकेतील हे वृत्त दिले होते. त्यामुळे कालव्यांना पाणी सुटण्याची आशा वाढली होती. मुळातच हंगामी पाणी देण्यास विलंब झाला आणि त्यातही पुन्हा कमकुवत नादुरुस्तीमुळे यंदा उन्हाळी हंगामासाठी पाणी उशिरा सोडण्यात आले. एकीकडे केरळमध्ये मान्सून धडकला असताना दुसरीकडे या कालव्यांना पाणी सोडण्यात आले, यातून जलसंपदा विभागाचे तत्परता ठळकपणे लक्षात येते.
तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याखाली लातूर तालुक्यातील शिऊर, अंकोली, चिंचोलीराव, गंगापूर तर औसा तालुक्यातील आलमला, उंबडगा बु. व खु. या शिवारातील शेती येते. या भागातील कालव्याखालील शेतकऱ्यांना या (Latur Tawarja Project Canals) पाणी पाळीचा फायदा होणार असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कालव्यांना अधिक दाबाने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.