Substandard Seeds Case: बियाणे कंपन्या बोगस बियाणांची निर्मिती करण्याचा आरोप, शेतकरी धोके; कृषि विभाग सतर्क राहील. जिल्हाधिकारी करतात
निकृष्ट बियाणांवर कृषि विभागाची धडक कारवाई
हिंगोली (Substandard Seeds Case) : पेरलेल्या बियाणांचा उगवणीचा काळ सुरू असताना अनेक ठिकाणी उगवण झालीच नाही, म्हणुन शेतकर्यांच्या तक्रारी सुरू झाल्या. यावरून जिल्हाधिकार्यांनी पत्रकारां समोर कृषि अधिक्षकांची झाडाझडती घेतली. यावेळी तीन महिन्यात ३४ नमुने बोगस आढळल्याचे कृषि अधिक्षकांनी कबुल केले.
चालू वर्षात मे ते जुलै या कालावधीत विविध बियाणे कंपन्यांचे एकूण ३८५ बियाणे नमुने कृषी विभागाने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी मे महिन्यात ३४, जूनमध्ये ३३९ आणि जुलैमध्ये १२ नमुने समाविष्ट आहेत. आतापर्यंत तपासलेल्या नमुन्यांपैकी ३४ नमुने अप्रमाणित म्हणजेच फेल आढळले आहेत. अप्रमाणित आढळलेल्या कंपन्यांमध्ये ईगल सीड्स, जेएस सीड्स, रवी सीड्स, पार्श्व जेनेटीक्स, बुस्टर प्लांट जेनेटीक्स, दत्तरी अॅग्रो प्रा.लि., ऑस्कर सीड्स, विगर बायोटेक, इनोव्हेज अॅग्रो, एशियन सीड्स, श्री ओस्तवाल सीड्स, शिवसागरमोती सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, अंकुर सीड्स, निर्मल सीड्स, बन्सल सीड्स, स्नेहा अॅग्रोटेक, युलिंक सीड्स आणि सहर्ष सीड्स यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या वेगवेगळ्या लॉटचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. या प्रकरणांपैकी ७ प्रकरणांमध्ये न्यायालयीन खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित २७ प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून पुढील कारवाई कृषी विभागाकडून सुरू आहे.
आतापर्यंत १७५ बॅग बियाण्यांच्या विक्रीस तात्काळ स्थगिती म्हणजेच स्टॉप सेलचा आदेश देण्यात आला आहे. बियाण्यांची गुणवत्ता, साठवणूक आणि विक्रीवर जिल्ह्यात नियमित लक्ष ठेवले जात आहे. शेतकर्यांनी नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावेत, खरेदीची पावती जतन करावी आणि निकृष्ट बियाणे आढळल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
बोगस आढळलेल्या बियाणांची माहिती दाबली
मागील तीन महिन्यात कृषि विभागातर्फे विविध बियाणे कंपन्यांचे एकुण ३८५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मे आणि जून महिन्यात घेतलेल्या या नमुण्यांची तपासणी झाल्यानंतर त्यातील ३४ नमुने बोगस निघाल्याचे कृषि अधिक्षकांनी पत्रकारांसमक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतलेल्या बैठकीत कबुल केले. याबाबत प्रसिध्दी देऊन शेतकर्यांना या बोगस बियाणांची व संबंधित कंपन्यांची माहिती कृषि विभागाने का दिली नाही, असा सवाल जिल्हाधिकार्यांनी विचारताच कृषि अधिकार्यांची भंबेरी उडाली. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांचे बियाणे बोगस निघाले त्यांचेच एजंन्ट कृषि विभागाच्या अधिकार्याच्या कक्षामध्ये सर्रास बसलेले आढळतात असा आरोपही पत्रकारांनी पत्रकार परीषदेत केला.