वृंदावन येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी दुपारी यमुना नदीत उलटल्याची भीषण दुर्घटना घडली आहे.
वृंदावन यमुना बोट दुर्घटना : भजन सुरू असताना क्षणात घडला भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
मथुरा (Vrindavan Boat Accident) : वृंदावन येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी दुपारी यमुना नदीत उलटल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, अनेक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. पंजाबमधील भाविकांचा समावेश असलेला हा गट नौकाविहारासाठी नदीत उतरला होता.
घटनेच्या काही क्षण आधी बोटीतील पर्यटक भजनात मग्न होते, मात्र काही वेळातच परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि आनंदाचा माहोल किंकाळ्या व आरडाओरडात बदलला. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात प्रवाशांची गोंधळलेली आणि जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड दिसत आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत १६ ते १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून यमुना नदीत शोधमोहीम सुरू आहे.
वृंदावनचे सर्कल ऑफिसर पीतम पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियानामधून सुमारे ३० हून अधिक भाविकांचा गट बसने वृंदावन येथे आला होता. त्यापैकी काही जणांनी नौकाविहाराचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान हा अपघात घडला. मृतांमध्ये लुधियानातील प्रवाशांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि बचावलेले पर्यटक चेतन यांनी सांगितले की, “आम्ही सर्व जण बोटीत भजन गात होतो. अचानक बोट काहीतरीला धडकली आणि काही क्षणातच उलटली. सर्वजण पाण्यात बुडू लागलो. हा प्रसंग अत्यंत भीषण होता.” त्यांनी पुढे सांगितले की, घटनास्थळी उपस्थित पाणबुड्यांनी तत्काळ मदत करत अनेकांचे प्राण वाचवले.
बचावलेल्यांना अद्यापही कोण सुरक्षित आहे याची पूर्ण माहिती नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. काही जण रुग्णालयात आणि प्रशासन कार्यालयात आपल्या नातेवाईकांचा शोध घेत फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बांके बिहारी क्लब’तर्फे ही सहल आयोजित करण्यात आली होती. लुधियाना आणि जग्राँ येथील भाविक या सहलीत सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री बसने निघालेला हा गट शुक्रवारी सकाळी वृंदावनमध्ये पोहोचला होता. यमुना काठावरील केशी घाट येथे जाण्यासाठी दोन बोटी घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक बोट पाण्यावर तरंगणाऱ्या फलाटाला धडकल्याने उलटल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक नदीत कार्यरत आहे.