Breaking News
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

होम > देश

ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआय तपासात पोलिसांच्या हलगर्जीपणाचा खुलासा

स्थानिक पोलिसांकडून पुराव्यांच्या हाताळणीत झालेल्या गंभीर त्रुटींमुळे तपास यंत्रणांचे लक्ष एका पोलीस अधिकाऱ्याकडे वळले आहे.


ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट सीबीआय तपासात पोलिसांच्या हलगर्जीपणाचा खुलासा

Twisha Sharma Death Case |

भोपाळ (Twisha Sharma Death Case) : प्रसिद्ध मॉडेल ट्विशा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासादरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या असून, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विशेषतः स्थानिक पोलिसांकडून पुराव्यांच्या हाताळणीत झालेल्या गंभीर त्रुटींमुळे तपास यंत्रणांचे लक्ष एका पोलीस अधिकाऱ्याकडे वळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विशा शर्मा यांच्या मृत्यूच्या रात्री कटारा हिल्स पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक दिनेश शर्मा यांची रात्रपाळी होती. तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा लिगेचर बेल्ट घटनास्थळावरून जप्त करण्यात आला होता. मात्र हा बेल्ट पोस्टमॉर्टम प्रक्रियेदरम्यान संबंधित वैद्यकीय संस्थेकडे वेळेत जमा करण्यात आला नसल्याचे सीबीआयच्या चौकशीत उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा महत्त्वाचा पुरावा सुमारे दोन दिवस अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनातच राहिल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित बेल्ट तातडीने फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुराव्यांच्या साखळीत व्यत्यय आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ट्विशा यांच्या कुटुंबीयांनीही या निष्काळजीपणावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. महत्त्वाचा पुरावा वेळेत उपलब्ध न झाल्याने सुरुवातीपासूनच मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांच्या कथित हलगर्जीपणामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सीबीआयकडून या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याचबरोबर तपासात आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही मुद्देही पुढे आले आहेत. ट्विशा ज्या खासगी कंपनीत कार्यरत होत्या, त्या कंपनीकडून त्यांना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आर्थिक बाबींचाही तपासाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने मंगळवारी तिचे पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. हुंडाबळी प्रकरणात आरोपी असलेल्या समर्थ सिंह आणि गिरीबाला सिंह यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून करण्यात आली नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. वृत्त लिहिताना न्यायालयाकडून आदेशाची प्रक्रिया सुरू होती.

ट्विशा शर्मा प्रकरणातील महत्त्वाच्या घडामोडी

साखरपुड्यापासून मृत्यूपर्यंतचा घटनाक्रम

१२ मे २०२५ : नोएडामधील एका फ्लॅटमध्ये ट्विशा शर्मा आणि समर्थ सिंह यांचा साखरपुडा पार पडला.

डिसेंबर २०२५ : नोएडाची रहिवासी असलेली मॉडेल-कलाकार ट्विशा शर्मा हिने वकील समर्थ सिंह याच्याशी विवाह केला. समर्थ हा निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचा मुलगा असून विवाहानंतर ट्विशा भोपाळच्या कटारा हिल्स परिसरातील सासरी राहू लागली.

१२ मे २०२६ : ट्विशा तिच्या सासरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला.

१५ मे : निवृत्त न्यायाधीश आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गिरीबाला सिंह यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, तर समर्थ फरार होता.

१६ मे : प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली.

१७ मे : मुख्यमंत्री यांची भेट न मिळाल्याने ट्विशाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर अल्पकाळ आंदोलन केले.

१८ मे : समर्थ सिंहचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

१९ मे : पोलिस तपासाबाबत शंका व्यक्त करत ट्विशाच्या नातेवाईकांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली. तसेच आरोपींकडून घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांमधून ट्विशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला.

२० मे : ट्विशाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी प्रकरणाचा सीबीआय तपास केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळली. समर्थच्या अटकेसाठीचे बक्षीस ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले.

२१ मे : गिरीबाला सिंह यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली. समर्थने नव्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्याच दिवशी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याबाबत गृह विभागाची बैठक झाली.

२२ मे : जबलपूर जिल्हा न्यायालयात आत्मसमर्पणासाठी आलेल्या समर्थ सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली.

२ जून : सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ट्विशाच्या कथित आत्महत्येच्या परिस्थितीची पुनर्रचना केली. यासाठी सुमारे ८० किलो वजनाचा वाळूने भरलेला डमी वापरण्यात आला. शरीराचे वजन आणि संतुलन वास्तवदर्शीपणे दाखवण्यासाठी डमीच्या पायांना लोखंडी डम्बेल्स बांधण्यात आल्या होत्या.

सध्या सीबीआयकडून विविध पैलूंवर तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला असून, ट्विशा यांचे पती समर्थ सिंह यांनी त्याच कंपनीत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे आढळले आहे. कंपनीतील या आर्थिक व्यवहारांचा आणि ट्विशा यांना पगार न मिळण्याचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा शोध सीबीआय घेत आहे.

सध्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसह संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: