म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागातून स्थलांतर करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट ओढावले आहे.
म्यानमारच्या राखाइन राज्यातून निघालेल्या दोन बोटी समुद्रात दुर्घटनाग्रस्त; UNHCR आणि IOM कडून तीव्र चिंता व्यक्त
म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागातून स्थलांतर करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट ओढावले आहे. बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्याच्या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांची निर्वासित संस्था (UNHCR) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (IOM) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून, समुद्रात बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातून निघाल्या होत्या. या बोटीतील सर्व प्रवासी रोहिंग्या समुदायातील असून, त्यापैकी काहींनी बांगलादेश सीमेवरून प्रवास सुरू केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे आणि उंच लाटांमुळे दोन्ही बोटी उलटल्या. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
IOM आणि UNHCR यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पहिल्या बोटीत २५० प्रवासी होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच या बोटीचा संपर्क तुटला. तर ८ जुलै रोजी म्यानमारमधील इरावदी किनाऱ्याजवळ सुमारे २८० जणांना घेऊन जाणारी दुसरी बोट उलटल्याचा अंदाज आहे.
दोन्ही बोटींमधील मिळून ५३० जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनास्थळी बचाव पथके कार्यरत असून, अनेक मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.