‘ग्रीन सान्वी’ आणि ‘ग्रीन आशा’ ही दोन भारतीय एलपीजी टँकर्स होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाल्याची माहिती भारत सरकारने दिली. यामुळे इंधन पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली आहे.
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘ग्रीन सान्वी’ आणि ‘ग्रीन आशा’ ही दोन भारतीय एलपीजी टँकर्स अत्यंत संवेदनशील होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या घडामोडीमुळे देशातील इंधन पुरवठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे.
सरकारच्या माहितीनुसार, ‘ग्रीन सान्वी’ हे जहाज ४६,५०० मेट्रिक टन एलपीजी आणि २५ खलाशांसह भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. तर ‘ग्रीन आशा’ (पूर्वी ग्रीन होप) हे जहाज १५,००० मेट्रिक टन एलपीजी आणि २६ खलाशांसह सुरक्षित मार्गक्रमण करत आहे.
सध्या पर्शियन आखातात एकूण १६ भारतीय जहाजे आणि ४३३ खलाशी कार्यरत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र मंत्रालय सातत्याने संपर्कात आहे.
अन्नधान्याचा भरपूर साठा
केंद्र सरकारने देशात अन्नधान्याची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताकडे निर्धारित मानकांपेक्षा तिप्पट बफर स्टॉक उपलब्ध आहे.
- गहू : २२२ लाख मेट्रिक टन
- तांदूळ : ३८ दशलक्ष मेट्रिक टन
- एकूण अन्नसाठा : ६०२ लाख मेट्रिक टन
हा साठा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा असल्याचे सरकारने सांगितले.
इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३५ दिवसांत देशातील सुमारे १८ कोटी घरांना एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असले तरी अतिरिक्त मालवाहतुकीचे करार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली असून, आतापर्यंत ८५० पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी २२० जणांना अटक करण्यात आली आहे.
परिस्थितीवर केंद्राचे लक्ष
मध्य पूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता, इंधन व अन्नसुरक्षेबाबत केंद्र सरकार सतत आढावा घेत आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.