कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या आगामी राजकीय आणि सामाजिक भूमिकेची घोषणा करत केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली.
'क्या बोलती पब्लिक' अभियानाची घोषणा; शिक्षणाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या आगामी राजकीय आणि सामाजिक भूमिकेची घोषणा करत केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली. देशभरात "क्या बोलती पब्लिक" या नावाने जनसंवाद मोहीम राबविण्यात येणार असून, बेरोजगारी, शिक्षण आणि संविधान हे या अभियानाचे प्रमुख विषय असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दीपके यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या राजीनाम्याला त्यांनी आपल्या आंदोलनाचा विजय मानले आहे. पक्षाची विचारधारा ही संविधानावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील शिक्षण घेणे म्हणजे नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढण्यासारखे झाले असून, विद्यमान शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
आंदोलनामुळे सामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली असल्याचा दावा करत त्यांनी न्यायासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य लोकांकडे पुरेसा वेळ आणि आधार नसल्याचेही म्हटले. त्यामुळे CJP आता देशभरात लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेत दीपके यांनी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आपल्या पक्षाची भूमिका प्रमुख विरोधी पक्षाप्रमाणे असल्याचे संकेत दिले. देशातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे बेरोजगारी असल्याचे सांगताना त्यांनी जंतर-मंतर येथे मोठ्या संख्येने बेरोजगार युवक सहभागी झाल्याचा उल्लेख केला. तसेच देशाचे भविष्य अशिक्षित लोक ठरवत असल्याची टीका करत बेरोजगारीच्या प्रश्नावर पक्ष सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवरही भाष्य केले. न्यायालयाच्या माध्यमातून पक्ष चोरला जात असल्याचा आरोप करत लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच 2014 मध्ये नागरिकांना विकासाची केवळ स्वप्ने दाखवण्यात आली, असा आरोप करत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील असल्याचा उल्लेख करत दीपके म्हणाले की, या तरुणांच्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शिक्षण आणि बेरोजगारी हेच तरुणांसमोरील सर्वात महत्त्वाचे प्रश्न असून, सध्याचे सत्ताधारी हिंदू-मुस्लिम मुद्यांवर राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
येत्या काळात "क्या बोलती पब्लिक" या देशव्यापी मोहिमेद्वारे विविध शहरांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. या मोहिमेत शिक्षण हा केंद्रबिंदू असेल आणि शिक्षणासाठी होणारा वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.