जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतर (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवल्यानंतर CJP संस्थापक अभिजित दीपके यांचा संताप; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरही गंभीर आरोप
नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. देशाच्या इतिहासात अनेक महान पंतप्रधान होऊन गेले, मात्र नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दीपके म्हणाले की, NEET प्रकरणात 20 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित जबाबदारी निश्चित होईल आणि सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोषींवर कारवाई करण्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर पोलिस कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचाही दावा त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत बोलताना दीपके यांनी, "सरकार त्यांचे इतके संरक्षण का करत आहे?" असा प्रश्न उपस्थित केला. 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूपेक्षा धर्मेंद्र प्रधान अधिक महत्त्वाचे आहेत का, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविल्याचा उल्लेख करताना दीपके भावूक झाले. त्यांनी दावा केला की, वांगचुक यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. 60 वर्षीय व्यक्ती सलग 20 दिवस उपोषणावर असताना त्यांना जबरदस्तीने हलविण्यात आले, तसेच त्यांच्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वांगचुक यांना आंदोलनस्थळ सोडण्याची इच्छा नव्हती, असेही दीपके म्हणाले.
यावेळी दीपके यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत, न्यायासाठीचा लढा मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.