NEET Exam Cancelled: NEET 2026 परीक्षा राजस्थान व इतर राज्यात पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवीन परीक्षा तारीख जाहिर केली जाणार.
राजस्थान व इतर राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण;
लवकरच फेर परिक्षेची तारीख जाहिर केली जाणार
हिंगोली (NEET Exam Cancelled) : देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी 'नीट' २०२६ ही परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा राजस्थान व इतर राज्यातील पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना आता फेर परिक्षा द्यावी लागणार असल्याने गैरसोयीत वाढ झाली आहे.
३ मे रोजी विविध केंद्रांवर (NEET Exam Cancelled) नीट २०२६ परीक्षा पार पडली होती. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही केंद्रांवर पेपर फुटल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हे आरोप फेटाळून लावले होते, परंतु प्राथमिक तपासात अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिकांच्या संचामध्ये तफावत आणि काही संशयास्पद बाबी आढळल्या आहेत.
फेरपरीक्षा कधी? परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. ३ मे रोजी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे. यासाठी वेगळा अर्ज करण्याची किंवा पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही. फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
एकीकडे परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे पेपरफुटीच्या रॅकेटमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता सर्वांचे लक्ष नवीन तारखेकडे लागले आहे. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी हााू.हूa.हग्म्.ग्ह या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारदर्शकतेसाठी निर्णय योग्यच!
३ मे रोजी झालेली नीट परीक्षा : पेपरफुटीमुळे रद्द (NEET Exam Cancelled) करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना यामुळे न्याय मिळाला आहे. मेहनतीच्या जोरावर यश मिळवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरपणा अत्यावश्यक आहे. जेणेकरून खर्या अर्थाने मेहनत करणार्या विद्यार्थ्यांच्या कष्टांना योग्य फळ मिळेल आणि वारंवार पेपर फुटण्याच्या घटनांमुळे परीक्षा यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे. सरकारने केवळ परीक्षा रद्द करून थांबू नये, तर दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा उभी करावी.'
-अॅड. निकुंज अग्रवाल (संचालक), फिजीक्सवाला, हिंगोली