भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौर्यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
यवतमाळ (Yavatmal News) : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौर्यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून व बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने आंबेडकरी संघटनांनी न्या. गवई यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी लावलेले त्यांचे स्वागत फलक महाराष्ट्र दिनी कार्यकर्त्यांनी फाडले.
एका कार्यक्रमासाठी न्या. गवई यवतमाळमध्ये येणार असल्याने शहरात त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या वकिलांनी हे फलक लावले होते, थेट त्यांच्या घरावर धडक देवून 'समाजद्रोही काम करणार्यांचे स्वागत कसे करता?', असा जाब विचारला. त्यानंतर आंबेडकरी समाज संघटनांच्या पदाधिकार्यांकडून काल माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले बॅनर फाडण्यात आले. यावेळी अॅड. जयसिंह चव्हाण, उमेश मेश्राम, अँड.धनंजय मानकर, अँड.प्रशांत किर्तक, राजा गणवीर, संजय बोरकर, प्रमोदिनी रामटेके, नारायण थुल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.