Malkapur Damini Pathak: काही दिवसांपासून महिला व मुलींची छेडछाड, पाठलाग, अश्लील हावभाव, वाईट नजरेने पाहणे, प्रयत्न अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण
मलकापुरात सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना, पत्रकार व नागरिकांचे निवेदन; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
मलकापूर (Malkapur Damini Pathak) : मलकापूर शहरासह ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनी, महिला व युवती शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विविध कामानिमित्त दररोज शहरात ये-जा करीत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींची छेडछाड, पाठलाग, अश्लील हावभाव, वाईट नजरेने पाहणे तसेच त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 'दामिनी पथक' तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना, पत्रकार व नागरिकांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, शहरातील प्रमुख रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, उद्याने तसेच गर्दीच्या ठिकाणी काही रोडरोमिओ आणि समाजकंटकांकडून महिला व मुलींचा पाठलाग करणे, त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहणे, छेडछाड करणे व मानसिक त्रास देण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक प्रभावीपणे कार्यरत होते. या पथकामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती आणि समाजकंटकांवरही वचक निर्माण झाला होता. मात्र, सध्या हे पथक प्रभावीपणे कार्यरत नसल्याने महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.
महिलांवरील संभाव्य अत्याचार व छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित करून संवेदनशील भागात नियमित गस्त वाढविणे, शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष ठेवणे, तसेच महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महिला, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनावेळी बाळू पाटील, प्रविण क्षिरसागर, निलेश नारखेडे, पत्रकार मनोज पाटील, अनिल गोठी शेख जमील शेख जान मोहम्मद, सतीश दांडगे, नारायण पानसरे, निलेश चोपडे, राजेश इंगळे, अशोक रावणकार, सैयद ताहेर, शेख निसार, अजय टप, सुरेश मराठे, शुभम नेमाने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.