अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात २४ जून रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गोविंद पिंजरकर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
२४ जून रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर गोविंद पिंजरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी; शहरातील रानडुकरांच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरली
अमरावती (Wild Boar Attack) : अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात २४ जून रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गोविंद पिंजरकर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर आशियाड कॉलनीसह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
काय घडली होती घटना?
२४ जून रोजी पहाटे सुमारे सव्वा पाच वाजता गोविंद पिंजरकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. आशियाड कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून त्यांचे एक बोटही तुटले होते. या घटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरभर खळबळ उडाली.
बिबट्यानंतर आता रानडुकरांची दहशत
गेल्या वर्षी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात बिबट्याचा वावर आढळला होता. त्यानंतर आशियाड कॉलनी परिसरातही बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता नाल्यालगत राहणाऱ्या रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या डुकरांच्या शिकारीसाठी भविष्यात पुन्हा बिबट्या निवासी भागात येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे रहिवासी रात्री-अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
गोविंद पिंजरकर यांच्या मृत्यूनंतर आशियाड कॉलनीतील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून वन्य प्राणी आणि रानडुकरांचा शहरात प्रवेश होत असल्याने त्या ठिकाणी मजबूत कंपाउंड वॉल उभारावी किंवा नाल्यावर पूर्णपणे बंदिस्त आरसीसी गटर लाईनचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
'इतरांचे जीव वाचावेत' : मुलाचे आवाहन
गोविंद पिंजरकर यांचे पुत्र प्रवीण गोविंद पिंजरकर यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. "महानगरपालिकेकडून फारशा अपेक्षा ठेवणे योग्य नाही. जी यंत्रणा नालीसफाई व्यवस्थित करू शकत नाही, त्यांच्याकडून सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत मोठ्या अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. माझे वडील गेले, पण इतर कोणाच्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी," असे त्यांनी म्हटले.