एप्रिल अखेर होत असतानाच मे महिन्याच्या उष्णतेची चाहूल लागली आहे.
चिखली तालुक्यातील पहिला टँकर भालगावात दाखल
चिखली (Water Shortage) : एप्रिल अखेर होत असतानाच मे महिन्याच्या उष्णतेची चाहूल लागली असून, वाढत्या तापमानामुळे चिखली तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली आहे. तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून टँकरची मागणी करणाऱ्या भालगाव ग्रामस्थांना अखेर दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामातील हा तालुक्यातील पहिलाच टँकर ठरला आहे.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भालगाव येथील ग्रामस्थांनी मागील महिनाभरापासून टँकरची मागणी सातत्याने लावून धरली होती. अखेर २८ एप्रिल रोजी सुमारे २५ हजार लिटर क्षमतेचा टँकर गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी २५ एप्रिल रोजी भालगावच्या सरपंच मीना संतोष परिहार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या प्रतिनिधीमंडळाने तहसीलदार विजय सवडे यांची भेट घेऊन गावातील तीव्र पाणीटंचाईची समस्या मांडली होती. यावेळी मंगला गणेश परिहार, संदीप परिहार, रवींद्र बळीराम परिहार, सूरज आसोलकर, प्रियंका गजानन पोपळघट, गजानन विश्वनाथ परिहार, सीमा रामदास चव्हाण, शितल मोहन इंगळे तसेच ग्रामपंचायत सचिव कांचन सरदड आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने टँकर मंजूर केला.
दरम्यान, पहिला टँकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील विहिरीत सोडण्यात आला असून, त्या पाण्याचा साठा ग्रामपंचायतीमार्फत जलटाकीत करून नळयोजनेद्वारे गावकऱ्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. टँकर उपलब्ध झाल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने वेळेवर दखल घेऊन टँकर उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच मीना परिहार यांनी आभार व्यक्त केले असून, आगामी काळातही पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.