Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मुंबई

Vishakha Tilkar

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे एका 26 वर्षीय नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.


लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या डॉक्टर पतीसह तिघांना अटक

Vishakha Tilkar |

हुंड्याची मागणी, शारीरिक-मानसिक छळ आणि सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप; अंबरनाथमधील घटना

ठाणे (Vishakha Tilkar) : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे एका 26 वर्षीय नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. विवाहाला अवघे दीड महिना झाल्यानंतर विशाखा तिळकर हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली असून, तिच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी दबाव, मानसिक व शारीरिक छळ तसेच सतत देखरेख ठेवल्यामुळे विशाखाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आला आहे.

मंगळवारी विशाखा तिळकर आपल्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी पती डॉ. नितीन तिळकर, सासू छाया तिळकर आणि दीर निनाद तिळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

तक्रारीनुसार, विशाखा आणि डॉ. नितीन तिळकर यांचा विवाह 30 एप्रिल रोजी झाला होता. लग्नापूर्वी दोघांमधील संबंध चांगले होते. मात्र सासरी गेल्यानंतर तिच्यावरील वागणुकीत बदल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंवर नाराजी व्यक्त करत अधिक सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची मागणी आरोपींकडून करण्यात आली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

विशाखाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी घराच्या आतील आणि बाहेरील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तिच्या दैनंदिन वर्तनाबाबत वारंवार जाब विचारला जात असे. तसेच शेजाऱ्यांशी संवाद साधल्यास तिला मारहाण केली जात असल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मृत्यूच्या दोन दिवस आधी शेजारील एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून डॉ. नितीन तिळकर यांनी विशाखाला मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखाने आपल्या आईकडे सासरी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. तिने आपल्यावर होत असलेल्या छळाबाबत वारंवार व्यथा व्यक्त केली होती. तिचे आई-वडील तिला माहेरी परत आणण्याची तयारी करत होते. मात्र त्याआधीच मंगळवारी तिच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी त्यांना मिळाली.

या प्रकरणाबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे आणि पती पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध क्रूरता तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Related to this topic: